अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटप प्रकरणात योग्य कारवाई होईल:मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, मुंबई क्लायमेट वीक परिषदेवरही प्रतिक्रिया




राज्यात गाजत असलेल्या 75 शिक्षण संस्थांना देण्यात आलेल्या अल्पसंख्यांक प्रमाणपत्र प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घोटाळ्यात मंत्रालयातील एका उपसचिवाचे नाव समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “प्रमाणपत्र वाटपात ज्यांनी कोणी अनियमितता किंवा गडबड केली असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरली होती. मात्र या दुर्घटनेनंतर काही तासांतच मंत्रालयात एक वेगळंच प्रकरण घडल्याची माहिती समोर आली. अल्पसंख्याक विकास विभागाकडून राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्टपासून स्थगित ठेवण्यात आली होती. तरीही अजित पवार यांच्या निधनानंतर लगेचच या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याची दखल घेतली. 75 शाळांना देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जाला स्थगिती देण्यात आली. यामध्ये ज्यांनी कोणी गडबड केली असेल, त्यांच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुंबईत १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान जिओ वर्ल्ड सेंटर येथे देशातील पहिली ‘मुंबई क्लायमेट वीक’ (MCW) परिषद सुरू झाली असून, हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. लाईफ क्वॉलिटी सुधारण्यावर भर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “’मुंबई क्लायमेट वीक’ (MCW) परिषद मुंबईत सुरू झालेली आहे. दरवर्षी मुंबईत आयोजित केली जाईल. ३५ देशातून लोक याठिकाणी आलेले आहेत. विशेषत: क्लायमेट ॲक्शन या विषयावर डेलिब्रेशन होतील. वेगवेगळ्या प्रकारचे अलायन्सस होतील. आज एमएमआरडीएने देखील काही चांगले अलायन्सेस क्लायमेट ॲक्शनवर घेतलेले आहेत. आपल्याला पुढच्या काळात विशेषत: क्लायमेट चेंजचा सामना करत असताना ज्या प्रकारे हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि लाईफ क्वॉलिटी ही सुधारायची आहे. त्यादृष्टीने ही कॉन्फरन्स अत्यंत महत्त्वाची आहे.” शेती आणि स्टार्टअप्सना मिळणार बळ शेती क्षेत्रावर हवामान बदलाचा वाढता परिणाम लक्षात घेता, या विषयावरही सकारात्मक चर्चा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “शेतीवरील परिणाम कमी करण्यासाठी काही प्रभावी मॉडेल्स आणि नवकल्पनात्मक स्टार्टअप्स पुढे आले आहेत. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. जागतिक अर्थव्यवस्थेची ‘मुंबईत’ रणनीती दरम्यान, ‘ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन’ या तीन दिवसीय शिखर परिषदेचाही आज मुंबईत प्रारंभ झाला. जागतिक अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर विविध देशांमध्ये सहकार्य आणि नव्या पुरवठा साखळ्या (सप्लाय चेन) निर्माण करण्याच्या दृष्टीने या परिषदेला विशेष महत्त्व असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या परिषदेत देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उद्घाटन केले. पुढील तीन दिवसांत जगभरातील मान्यवर नेते या मंचावरून विचारमंथन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *