![]()
राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख निवडणुका पार पडल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे पुढील तीन वर्षे सत्ताधाऱ्यांनी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे आणि विरोधकांनी सरकारला कामावरून जाब विचारणे, हीच अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतरही पक्षप्रवेश आणि पक्षांतराचा सिलसिला थांबलेला दिसत नाही. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. नांदेडमधील या पक्षप्रवेशाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील उबाठा गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही लवकरच शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतरही राज्यातील राजकीय घडामोडी थांबलेल्या नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात आणखी काही नेते आणि कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेत प्रवेश करताना शंकर अण्णा धोंडगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही डावे-उजवे सर्व पर्याय पाहिले. मात्र दिलदार मनाचा आणि कार्यकर्त्यांशी नातं जपणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे. त्यामुळे आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या वेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख केला. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. आज शंकर धोंडगे आपल्यासोबत आले आहेत. तुम्ही सर्वजण एका विश्वासाने येथे आलात. कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता म्हणून आपण ओळख निर्माण केली आहे. या पक्षात कोणी मालक नाही किंवा चालक नाही. जो काम करेल तो पुढे जाईल. शेवटी कार्यकर्ता हाच पक्षाचा पाठीचा कणा असतो, असे म्हणत त्यांनी नव्या सदस्यांचे स्वागत केले. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल याच कार्यक्रमात शिंदेंनी शेतकरी प्रश्नांवरही भाष्य केले. राज्य सरकारकडून शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 32 हजार कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन, आम्ही दिलेल्या शब्दाला बांधील आहोत. योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी समिती नेमली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष निवडणुकीतील कामगिरीबाबत बोलताना शिंदेंनी सांगितले की, अलीकडील निवडणुकांमध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली आहे. महायुतीला जनतेने मोठा पाठिंबा दिला असून ही जनतेची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मी दानशूर आणि धाडसी आहे. एक वेळ अशी होती की धाडस दाखवावे लागले, आता कर्तृत्व दाखवण्याची वेळ आहे. शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर दरम्यान, कर्जमाफीच्या दृष्टीने प्रशासनाकडून हालचाली वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने सर्व बँकांना थकीत शेतकऱ्यांची माहिती शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जून 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या कर्जदारांची माहिती गोळा केली जात आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून सुमारे 74 हजार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून उर्वरित माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर असल्याचे संकेत मिळत आहेत. एकूणच, निवडणुका संपल्या असल्या तरी राज्यातील राजकारण आणि शेतकरी प्रश्न याभोवतीच्या घडामोडी अधिक वेगाने घडताना दिसत आहेत.
नांदेडनंतर संभाजीनगरचे ठाकरेंचे पदाधिकारीही शिंदेसेनेच्या वाटेवर:DCM म्हणाले, कार्यकर्ता हाच कणा; शेतकरी कर्जमाफीचेही आश्वासन
