प्रत्येक गोष्टीत धर्म आणणे भाजपचा जुना फंडा:हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार; भाजपच्या जाहिरनाम्यात 'टिपू'चा फोटो असल्याचा आरोप




काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान वादात भाजपने केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. भाजपने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवू नयेत. प्रत्येक गोष्टीत जात व धर्म आणणे हा भाजपचा जुना फंडा आहे. या फंड्याच्या अनुषंगाने ते माझ्या विधानाला हिंदू-मुस्लिम अँगल देत आहेत. ते माफीवीरांच्या पक्षाचे असल्यामुळे माझ्याकडे माफीची मागणी करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितपणे टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यांच्या या तुलनेमुळे भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवत माफीची मागणी केली आहे. सपकाळ यांनी आज रविवारी वर्धा येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, आम्हाला भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही. मी अत्यंत विनम्रपणे व तेवढ्याच स्वाभिमानाने सांगतो की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची आन – बान – शान आहेत. त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या पराक्रमामुळेच हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरुपात आपल्या संविधानापर्यंत आहे. हा भाजपचा खोडसाळपणा काल पत्रकारांनी मला महामानवांचे विशेषतः शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचे फोटो कार्यालयात लावण्यासंबंधी होणाऱ्या मागणीसंदर्भात प्रश्न केला होता. त्यावर मी माझे मत नोंदवत म्हणालो होतो की, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार दिला आणि त्याचा आदर्श टिपू सुलतानने घेतला. याच आदर्शानुसार तो इंग्रजांच्या विरोधात लढला. मी या अनुषंगाने बोललो. पण माझ्या मूळ विधानाला बाजूला ठेवून जे विधान चालवले जात आहे ते भाजपचा खोडसाळपणा आहे. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, प्रत्येक गोष्टीत जात व धर्म आणणे हा भाजपचा जुना फंडा आहे. या फंड्याच्या अनुषंगाने त्यांनी माझ्या एका जबाबदारपूर्ण विधानाला हिंदू-मुस्लिम अँगलने खतपाणी घातले. त्यांनी माझ्याकडे माफी मागण्याची मागणी केली आहे. ते माफीवीरांच्या पक्षाचे असल्यामुळे त्यांनी ही मागणी केली आहे. माझे विधान मला विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यातून शिवाजी महाराजांविषयीचा स्वाभिमान दिसून येतो. भाजपच्या जाहिरनाम्यात टिपू सुलतानचा फोटो हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी भाजपवर महापालिका निवडणुकीत टिपू सुलतानचा फोटो वापरल्याचाही दावा केला. भाजपला निवडणुकीत टिपू सुलतान चालतो. त्यांच्या महापालिका निवडणुकीच्या जाहिरनाम्यात टिपू सुलतानचा फोटो होता. त्यांनी माझा फोटो जाळण्याऐवजी सावरकरांनी ‘शिवाजी महाराज यायला… कावळा बसायला आणि डांग तुटायला’ हे जे विधान केले होते त्याचा निषेध करावा. भाजप त्यांचा पुतळा जाळणार आहे का? महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी अत्यंत विकृत विधान केले. त्यामुळे भाजप त्यांचाही पुतळा जाळणार आहे का?, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. हा संविधान संपवण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत एमआयएमची मदत घेतली. चंद्रपुरातही त्यांनी एमआयएमच्या मदतीने आपला महापौर बसवला. महाराष्ट्रात 21 ठिकाणी तुम्ही एमआयएमशी आघाडी केली, युती केली, मदत केली. ही गोष्ट आता लपून राहिली नाही. त्यामुळे काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षावर टीका करणे योग्य नाही. महापुरुषांच्या फोटोवर भाजपचे जे आक्षेप आहेत, तो संविधान संपवण्याचा एक डाव आहे, असे सपकाळ म्हणाले. सपकाळ पुढे म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली होती. त्यावर ते मी त्यांना ओळख नसल्याचे म्हणाले. मी त्यांना जल्लाद म्हणालो. क्रूर असण्याच्या अनुषंगाने दरिंदा म्हणलो. त्यावेळीह त्यांनी मला ओळख दाखवली नाही. पण काल मात्र त्यांनी आवेशात येऊन माझ्यावर गरळ ओकली. याचा अर्थ स्पष्ट आहे की, महाराष्ट्रात जे मुलभूत मुद्दे आहेत आणि दिल्ली स्तरावर ज्या फाईल्समध्ये बरेच काही लपले आहे, त्यावरून ते इतरत्र लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *