![]()
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली. या दाव्याला स्वतः रा
.
राम सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, त्यांच्या हत्येच्या कटाबाबत जिल्ह्याचे एसपी, आयजी आणि राज्याचे गुप्तहेर खाते मिळून तपास करत आहेत. तपासातून सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले. काही लोकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येत असल्याने एकत्र येऊन कट रचला जात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. माळशिरस तालुक्यातील काही लोकांचा सहभाग असू शकतो, अशा संशयावरून चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहिते-पाटील यांच्या संदर्भातील काही लोकांना पुढे करून अंगावर घालण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उत्तम जानकर यांनी थेट सवाल उपस्थित केला. मुर्दाड माणसाला कोण मारणार? असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये धराधरी, पकडापकडी अशा घटना घडतात, त्यात काही फार मोठा विषय नसतो, असे त्यांनी म्हटले. पालकमंत्र्यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल अधिक माहिती त्यांनाच असेल, असे सांगत जानकरांनी आरोपांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. माजी आमदाराच्या हत्येचा कट कोण रचेल आणि कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जानकर पुढे म्हणाले की, राम सातपुते यांनीच आगावपणा केला. गुलालाची पिस्तूल बाबा माने यांच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर रागाच्या भरात एकमेकांमध्ये धराधरी झाली. निवडणुकीच्या वातावरणात अशा घटना घडत असतात. या प्रकाराला हत्येच्या कटासारखे स्वरूप देणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुर्दाडाला कोण मारणार आणि कशासाठी? असे म्हणत त्यांनी या आरोपांवर उपरोधिक प्रतिक्रिया दिली.
आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत, असे सांगत जानकरांनी चोरीछुप्या कारवायांचा आरोप फेटाळला. राम सातपुते यांच्या अंगावर गेलेल्या लोकांना घाबरवण्यासाठीच पालकमंत्र्यांनी असे वक्तव्य केले असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची दखल कराचीच्या NIA ने घेतली का, असा सवाल करत त्यांनी या प्रकरणावर विनोदी पद्धतीने टीका केली. राजकीय विरोधक म्हणून सातपुतेंसाठी काही करावे, असे मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.
आरोप-प्रत्यारोपांचा संघर्ष अधिकच तीव्र
दरम्यान, अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी मुलाला सोबत नेऊन मतदान केल्याच्या प्रकरणावरून निवडणूक आयोगाच्या कारवाईबाबत विचारले असता, जानकरांनी आयोगावरच प्रश्न उपस्थित केले. एका गावात 96 टक्के मतदान झाले, तिथे आयोग झोपला होता का, असा सवाल त्यांनी केला. लहान मुलाने हट्ट केल्यामुळे मतदान केंद्रावर नेले असावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या सर्व घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. एका बाजूला हत्येच्या कटाचा गंभीर दावा, त्याला सातपुतेंचा दुजोरा आणि दुसऱ्या बाजूला जानकरांचा उपरोधिक पलटवार, यामुळे आरोप-प्रत्यारोपांचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. तपास यंत्रणा काय निष्कर्ष काढते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या तरी या प्रकरणामुळे राजकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा….
