12 फेब्रुवारीला देशव्यापी संप:कामगार संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची हाक




केंद्र सरकारच्या कामगारविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांविरोधात देशातील केंद्रीय कामगार संघटना व फेडरेशनने १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समितीने या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेले कामगार हिताचे ४१ कायदे केंद्र सरकारने रद्द केले आहेत. त्याऐवजी कामगारविरोधी आणि भांडवलदारांच्या हिताच्या ४ नवीन श्रम संहिता आणल्या आहेत. या श्रम संहितांच्या अंमलबजावणीची अधिसूचना २१ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली आहे. या नवीन श्रम संहितांमुळे कामगारांचा युनियन स्थापन करण्याचा, किमान वेतन मागण्याचा किंवा पेन्शनसारखी सामाजिक सुरक्षा मागण्याचा अधिकार संपुष्टात आला आहे. याशिवाय, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आणि बोनस यांसारख्या हक्कांवरही गदा आली आहे. स्थायी कामगारांऐवजी ‘फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट’द्वारे केवळ ४ ते ५ वर्षांसाठी कामगारांना कामावर ठेवले जाईल आणि त्यानंतर त्यांना कधीही कमी केले जाऊ शकते. या कामगारविरोधी ४ श्रम संहितांविरोधात १० केंद्रीय कामगार संघटना आणि ११ फेडरेशनने हा देशव्यापी संप घोषित केला आहे. हा संप कामगार, शेतकरी आणि शेतमजुरांचा आहे. अमरावतीमध्ये, मोर्चाचा शुभारंभ इर्विन चौकातून दुपारी १.३० वाजता होईल. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर तेथे दोन तास धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. या देशव्यापी संपात आयटक, सीटू आणि इतर संघटना सहभागी होत आहेत. यात केंद्रीय कर्मचारी, बँका आणि एलआयसीचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कामगार, बांधकाम कामगार तसेच किसान सभा आणि शेतमजूर संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *