![]()
तिवसा शहर आणि तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांनी आज, बुधवारी, १ जुलै रोजी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी कार्यालयाच्या दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत वारंवार वीज खंडित होण्यामुळे तिवसा येथील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, लघुउद्योजक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागतो, याची उदाहरणे दिली. एका बाजूला शासनाकडून स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असताना, दुसऱ्या बाजूला अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तिवसा शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या लिंक लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला दिले होते. मात्र, त्यानंतरही या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदाराची कानउघाडणी केली. शहराला अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी लिंक लाईनचे काम तातडीने पूर्ण करावे, वारंवार होणारा वीज खंड थांबवावा, अवाजवी वीजबिलांची चौकशी करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी, अशा मागण्या काँग्रेसने केल्या. या मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. खासदार बलवंत वानखडे यांनी महावितरण प्रशासनाला यासंदर्भात दिलेल्या निवेदनाची प्रतही अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली. तिवसा शहरातील वीजपुरवठा सुरळीत करून रखडलेले लिंक लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत खासदारांनी निर्देश दिल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आणखी व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असेही यावेळी बजावण्यात आले. या आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष वैभव वानखडे, महिला काँग्रेस अध्यक्ष पुनम काळमेघ, शहर कार्याध्यक्ष सुनील बाखडे, नगरसेवक योगेश वानखडे, नगरसेवक किसन मुंदाने, गजानन भोंबे, विश्वजीत बाखडे, अतुल गवड, दिवाकर भुरभुरे, आशिष ताथोडे, धीरज ठाकरे, प्रणव गौरखेडे, निलेश साव, प्रज्वल गुल्हाने, राज बावणे, पंकज काळमेघ, सर्जा वाघमारे, तुषार लेवटे, नरेंद्र बावणे, अनंत शेंद्रे, मंगेश राऊत, वीर डाहे, आकाश मकेश्वर, गौरव चौधरी, पंकज लांडगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काँग्रेसने महावितरण कार्यालयाला घेराव घातला:वीजपुरवठा खंडित, अवाजवी बिले आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन
