![]()
“आमचा दादा आम्हाला पोरका करून गेला… आमचा देवच गेला!” अशा शब्दांत काटेवाडीतील महिलांनी फोडलेला टाहो आणि समर्थकांच्या डोळ्यांतील अश्रूंचा पूर, अशा अत्यंत हृदयद्रावक वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव बारामतीहून त्यांच्या मूळ गावी, काटेवाडीत आणण्यात आले, तेव्हा संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता. नाळ जुळलेल्या मातीचा अखेरचा निरोप अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आणण्यात आले. दादांना सण-उत्सव आपल्या गावच्या घरी साजरा करण्याची ओढ असायची, त्यामुळे येथील जनतेशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती. आज जेव्हा त्यांचे पार्थिव घराबाहेर आले, तेव्हा लाडक्या नेत्याला शेवटचे पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. रोहित पवार गेटवर चढले रोहित पवारांनी सावरली परिस्थिती गर्दी इतकी प्रचंड होती की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांना स्वतः बंगल्याच्या गेटवर चढावे लागले. त्यांनी दोन्ही हात जोडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोलिसांनी रांगा लावून एक-एक करून नागरिकांना दर्शनासाठी आत सोडले.
दादा गेले विश्वास बसत नाही, काटेवाडीतील महिलांनी व्यक्त केल्या भावना “दादा गेले, यावर विश्वासच बसत नाही…” काटेवाडीतील फार्म हाऊसवर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असताना, तेथील महिलांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. एका महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “राष्ट्रवादीचे दोन गट झाले, पण आम्हाला कधीच त्याची जाणीव झाली नाही, कारण दादा आमच्यासाठी नेहमीच उभे होते. पण आज दादांचा मृत्यू झाला, यावर आमचा विश्वासच बसत नाही.”
अजित पवारांचे पार्थिव जेव्हा फार्म हाऊसवरून अंतिम संस्कारासाठी निघाले, तेव्हा हजारो नागरिकांचा समुदाय त्यांच्या मागे “अजितदादा अमर रहे” अशा घोषणा देत चालत होता. एका कर्तृत्ववान नेतृत्वाचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
"आमचा देवच गेला!":काटेवाडीत अजितदादांच्या निधनाने अश्रूंचा महापूर; लाडक्या बहिणींचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
