![]()
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ‘फोडाफोडीच्या बाजारा’बद्दल तीव्र शिसारी व्यक्त केली असताना, आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या युतीमागचे खरे गोम उघड केले आहे. “भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणापासून आपले नगरसेवक वाचवण्यासाठी आणि पक्ष टिकवण्यासाठीच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला,” असे स्पष्ट करत त्यांनी भाजपवर ‘कपटी मित्र’ अशी जहरी टीका केली आहे. राजू पाटील यांनी युतीचे समर्थन करताना भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आमच्या नगरसेवकांना भाजपकडून सातत्याने फोन येत आहेत. खुलेआम फोडाफोडी सुरू आहे. माझे नगरसेवक फुटू नयेत आणि त्यांच्या राजकीय भवितव्याला न्याय मिळावा, ही माझी जबाबदारी आहे. भाजप आमचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महिला अध्यक्षांना फोडण्याचे काम करत असेल, तर हे ओळखण्यासाठी मी बालबुद्धीचा नाही. अशा कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही चांगला.” सत्तेत नाही, केवळ बाहेरून पाठिंबा शिंदेसेनेशी केलेल्या युतीबाबत अधिक स्पष्टता देताना पाटील यांनी सांगितले की, “आम्ही केवळ पाठिंबा दिला आहे, सत्तेत सहभागी झालेलो नाही. सत्तेत जायचे असेल तर स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो, तसे आम्ही काहीही केलेले नाही. हा निर्णय पूर्णपणे पक्षहितासाठी घेतला असून, याबाबत राज ठाकरे यांना आधीच कल्पना देण्यात आली होती. भाजपला मनसेच्या नैतिकतेवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.” भाजप प्रदेशाध्यक्षांना थेट टोला राजू पाटील यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. “राजकारणात संधी सर्वांनाच मिळते, पण मैत्रीचे सोंग घेऊन पक्ष फोडण्याचे काम जे करत आहेत, त्यांना उत्तर देणे गरजेचे होते,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. केडीएमसीत मनसेच्या ५ नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे आता शिंदे गटाचे पारडे जड झाले असले, तरी या निमित्ताने भाजप आणि मनसेमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राज ठाकरेंची ‘ती’ जळजळीत टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त षन्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर अत्यंत संताप व्यक्त केला होता. “कल्याण-डोंबिवलीत जे काही सुरू आहे, त्याचा बाजार मांडला असून त्याची शिसारी येतेय. आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार भरला आहे. हे पाहून बाळासाहेब आज हयात नाहीत तेच बरे झाले, अन्यथा ते हे पाहून व्यथित झाले असते,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणाचा निषेध केला होता.
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!:सत्तेसाठी नव्हे, तर 'बचावा'साठी घेतला निर्णय, राज ठाकरेंच्या 'शिसारी' विधानानंतर राजू पाटलांचे स्पष्टीकरण
