![]()
बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मुंबईत बिहार भावन बांधण्याच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांचे बंधू तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहार सरकार कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात बिहार भवन बांधेल. या भवनाचे बांधकाम थांबवण्याची ताकद कुणातच नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा केली आहे. यावरून सध्या मोठा राजकीय वाद सुरु झाला आहे. मनसे व ठाकरे गटाने या भवनाला कडाडून विरोध केला आहे. त्यावर बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन बांधले जाईल. या भवनाचे काम थांबवण्याची ताकद कुणातही नाही. राज ठाकरे हे निरुपयोगी व्यक्ती आहेत. राज ठाकरे महाराष्ट्रातील राजे आहेत का? या देशात कुणाचाही जबरदस्ती चालणार नाही. बिहार भवन बांधू देणार नाही म्हणतात. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजे आहेत का? निव्वळ फालतू गोष्टी सुरू आहेत. हे भवन महाराष्ट्रात उपचारांसाठी जाणाऱ्या बिहारच्या नागरिकांच्या सोयीसाठी बांधले जात आहे. ते इतरही अनेक राज्यांत बांधण्यात येणार आहेत. बिहार भवन राज्यातील जनतेसाठी असंख्य सुविधा प्रदान करेल. ते कोणत्याही राजकीय अजेंड्याचा भाग म्हणून नाही तर मानवी गरजांना प्रतिसाद म्हणून बांधले जात आहे, असे चौधरी म्हणाले. मुंबईची जमीन बळकावण्याची प्रक्रिया सुरू दुसरीकडे, ठाकरे गटानेही बिहार भवन हे संसाधनांवरील ओझे व प्रादेशिक राजकारणाने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत या प्रकरणी बोलताना म्हणाले, मुंबईची जमीन बळकावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्या हे लोक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये गुजरात भवनही बांधतील. खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली. आता मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेत आली आहे. त्यामुळे या मुद्यावर त्यांचे विचार मांडणे ही त्यांची जबाबदारी आहे. शिंदे गट स्वतःला शिवसेना म्हणत असल्याने या मुद्यावर बोलणे व आवश्यक असल्यास निषेध करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे राऊत म्हणाले. सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार संजय निरुपम यांनी बिहार भवनाचे राजकारण करणे चुकीचे असल्याचा आरोप केला आहे. मनसेने बिहार भवनाचा विरोध करणे चुकीचे आहे. ही इमारत कर्करोग रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी बांधली जात आहे. याला विरोध करणारे विशेषतः मनसे यात काय भूमिका बजावतात? हा प्रकल्प मानवतेविषयी आहे. त्याचे राजकारण करणे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. कसे असेल बिहार भवन? नितीश सरकारने 30 मजली उंच इमारतीसाठी 314.20 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाची मान्यता दिली आहे. ही इमारत तळघरासह 30 मजली उंच असेल. तिची उंची अंदाजे 69 मीटर असेल. त्यात एकूण 178 खोल्या असतील. त्या सरकारी अधिकारी, पाहुणे व गरजू नागरिकांना राहण्यासाठी वापरल्या जातील. बिहारमधील रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मुंबईत राहण्याची सोय व्हावी यासाठी 240 खाटांचे एक खास वसतिगृहही बांधण्यात येणार आहे. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बिहारच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. कुठे बांधले जाणार आहे बिहार भवन? दुसरीकडे, बिहार फाउंडेशनचे मुंबईचे अध्यक्ष कैसर खालिद यांनी सांगितेल की, बिहार भवनच्या माध्यमातून मुंबई ते बिहार उद्योग आणि गुंतवणूकीला चालना देण्यासाठी रणनीती ठरवली जाईल. इमारत बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी म्हणाले की, ही इमारत पर्यावरणपूरक असेल. बिहार भवन 30 मजली उंच असेल. नितीश सरकार दक्षिण मुंबईतील एल्फिन्स्टन इस्टेटमध्ये ते बांधणार आहे. ही मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन आहे.
राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का?:मुंबईतील बिहार भवनाचे काम रोखण्याची ताकद कुणातच नाही, बिहारी मंत्र्यांचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र
