400 कोटींच्या कंटेनर चोरीचा संशय; नाशिकमध्ये अपहरण, SIT तपास सुरू:आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता




स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यभर राजकीय वातावरण तापले असतानाच, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या संशयातून नाशिक जिल्ह्यातील एका तरुणाचे अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केल्याने या प्रकरणाचे धागेदोरे आता अधिक खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात राहणाऱ्या संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आपल्यावर कर्नाटकातील चोरली घाटात 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपाच्या आधारे काही जणांनी त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेले. अपहरणानंतर आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली असून, स्वतःसह आपल्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप संदीप पाटील यांनी तक्रारीत केला आहे. या घटनेने केवळ अपहरणाचा नव्हे, तर संघटित गुन्हेगारीचा संशय अधिक बळावला आहे. तक्रारीत आणखी धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकारात काही व्यावसायिकांसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा दावा संदीप पाटील यांनी केला आहे. चोरीला गेलेली रक्कम ही मुंबई-ठाणे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला केवळ गुन्हेगारी नव्हे, तर आर्थिक आणि प्रशासकीय वळण मिळाले आहे. या आरोपांमुळे पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, निष्पक्ष तपासाची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा तपास करताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे (मुंबई) अशा पाच संशयितांना अटक केली आहे. यापैकी विराट गांधी याला अलीकडेच अटक करण्यात आली असून, अद्याप दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणामागे नेमके कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गोवा राज्यातून कर्नाटकातील एका देवस्थानासाठी नेण्यात येत असल्याचा बनाव करून जुन्या दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेला कंटेनर प्रवास करत होता. या कंटेनरमध्ये सुमारे 400 कोटी रुपयांची रोकड होती, असा दावा करण्यात येत आहे. ही रक्कम लंपास करण्यासाठीच संपूर्ण कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत असून, त्यानंतर या प्रकरणाची माहिती हळूहळू समोर येत आहे. प्रकरणाचे स्वरूप अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने, नाशिक ग्रामीण पोलिस दलाकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी यासंदर्भात माहिती देताना, निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासासाठी एसआयटी नेमण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या तपासात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात पोलिसांचा समन्वय साधण्यात येत असून, तिन्ही राज्यांतील यंत्रणा एकत्रितपणे या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता या प्रकरणात राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराचा संशय निर्माण झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशीतून आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा गुन्हा राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *