मोठेपणा पदात नाही, मनात असतो! शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात साधेपणाने पोहोचले खा.राहुल गांधी


राजकीय नेत्यांना लग्नसमारंभाला बोलावणे हे बहुतेक वेळा लग्नाच्या घरासाठी मोठे अवघड आणि तणावाचे काम ठरते. प्रोटोकॉल, सुरक्षा, व्यवस्था यामुळे घरच्यांची धावपळ वाढते. पण साधेपणातच खरे सौंदर्य असते ही म्हण खरी ठरवणारा एक प्रसंग अलीकडे हरियाणातील सोनीपत येथे घडला. भारताच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी एका शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात अत्यंत साध्या आणि आत्मीय पद्धतीने उपस्थिती लावून सर्वांचे मन जिंकले.

राजकारणात मोठी पदे असली तरी माणुसकीची उब जपली पाहिजे, याचे सुंदर उदाहरण या घटनेतून दिसून आले. कोणताही मोठा तामझाम नाही, विशेष प्रोटोकॉल नाही.जणू आपल्या घरच्या लग्नातच आल्याप्रमाणे राहुल गांधी लग्नाच्या घरी पोहोचले. त्यामुळे त्या शेतकरी कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. खरंच, मोठेपणा पदात नसतो, तर वागण्यात असतो याची प्रचिती या प्रसंगातून आली.सोनीपत येथे शेतकरी संजय यांच्या मुलगी तनूच्या लग्नासाठी राहुल गांधी सकाळी साधारण दहा वाजता पोहोचले. ते गाडीतून उतरत असताना त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला, पण त्यांनी त्याकडे फारसे लक्ष न देता उपस्थित युवकांशी आणि गावकऱ्यांशी हसतखेळत संवाद साधला. युवकांनी राहुल भाई राम राम असा आवाज दिला, आणि त्यांनीही तितक्याच आपुलकीने प्रतिसाद दिला.

तीन वर्षांपूर्वी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी राहुल गांधी यांनी याच शेतकरी संजय यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवला होता आणि धान रोपणातही सहभाग घेतला होता. त्या आठवणी अजूनही गावकऱ्यांच्या मनात ताज्या आहेत. लग्नाच्या घरी पोहोचल्यावर संजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हरियाणवी पगडी घालून सन्मानित केले. ते साध्या गाद्यांवर जमिनीवर बसून लग्नातील कार्यक्रमांचा आनंद घेत होते,ही गोष्टच त्यांच्या साधेपणाची साक्ष देणारी आहे. लग्नाच्या घरात जवळपास एक तास ते थांबले. घरातील मंडळींनी प्रेमाने दिलेले दूध आणि चूरमा त्यांनी आनंदाने स्वीकारले. घरातील महिलांनी गात असलेल्या पारंपरिक लग्नगीतांचाही त्यांनी मनापासून आनंद घेतला. जिथे प्रेम असते तिथे औपचारिकतेला स्थान नसते हे या प्रसंगातून स्पष्ट झाले.

तनू ही बी.कॉम. शिक्षण पूर्ण केलेली मुलगी असून तिचे लग्न रोहतक येथील सुनीलसोबत होत आहे. सुनीलने एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले असून तो एक क्रिकेटपटूही आहे. लग्नातील विविध रूढी-परंपरा, पोशाख आणि संस्कृती याबद्दल राहुल गांधी यांनी कुटुंबीयांकडून उत्सुकतेने माहिती घेतली. शेतकरी संजय हे फक्त अर्धा एकर जमिनीचे मालक आहेत. तरीही राहुल गांधी यांनी त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थिती लावली. शब्द दिला की तो पाळावा  ही म्हण ते अक्षरशः जगताना दिसले. विशेष म्हणजे, वधू तनूसाठी त्यांनी आपल्या वतीने एक रंगीत टीव्ही भेट म्हणून काल रात्रीच पाठवला होता.

२५ फेब्रुवारी रोजी गावातील सरपंचांसह संजय आणि त्यांच्या मोठ्या भावाने राहुल गांधी यांना लग्नाचे निमंत्रण दिले होते. सध्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन सुरू असतानाही त्यांनी वेळ काढून या लग्नाला हजेरी लावली हे त्यांच्या दिलदार स्वभावाचे प्रतीक आहे. या भेटीची विशेष बाब म्हणजे कोणतीही मोठी प्रसिद्धी, माध्यमांची गर्दी किंवा राजकीय प्रचार नव्हता. उलट, राहुल गांधी यांनी हा दौरा जाहीरही केला नाही. कारण जर हजारो कार्यकर्ते आणि लोक तिथे जमले असते, तर त्या गरीब शेतकरी कुटुंबावर अतिरिक्त ताण पडला असता. दुसऱ्याच्या अडचणीचा विचार करणारा माणूसच खरा मोठा हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

आजच्या काळात जगभरातील राजकारण, युद्ध आणि तणावाच्या बातम्यांमध्ये माणुसकी हरवते आहे असे वाटते. अशा वेळी एका साध्या शेतकरी कुटुंबाच्या आनंदात सहभागी होणारा नेता पाहून मनाला दिलासा मिळतो. जर देशातील सर्व नेत्यांनी अशी साधी, माणुसकीची आणि जमिनीशी जोडलेली जीवनशैली स्वीकारली, तर समाजातील अनेक समस्या आपोआप कमी होतील. खरंच, मोठेपण पदामुळे येत नाही; ते मनाच्या श्रीमंतीतून येते आणि या प्रसंगाने ते पुन्हा एकदा सिद्ध केले.

8 फेब्रुवारी 2023 चे खा. राहुल गांधी यांचे फोटो …..



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *