जिथे जेवाल तिथेच छेद कराल!:सुनील तटकरेंवर रामदास कदमांची टीका, जयंत पाटलांच्या भेटीवरही स्पष्ट केली भूमिका




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील यांनी घेतलेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना नेते रामदास कदम यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली. मात्र, जयंत पाटील यांच्या भेटीत कोणतेही संशयास्पद राजकारण पाहण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी त्यांची पाठराखण केली. रामदास कदम म्हणाले की, विरोधी पक्षातील आमदार किंवा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काहीही गैर नाही. “मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. मतदारसंघातील किंवा इतर कोणत्याही कामासाठी भेट घेणे ही सामान्य बाब आहे. प्रत्येक भेटीमागे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना कदम म्हणाले, “जयंत पाटील अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि चांगले व्यक्तिमत्त्व असलेले नेते आहेत. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांच्या चारित्र्यावर किंवा भूमिकेवर संशय घेण्याचे कोणतेही कारण नाही.” सुनील तटकरेंवर जहरी टीका यावेळी सुनील तटकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर रामदास कदम यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. “सुनील तटकरे कुणाचेच कायमचे होऊ शकत नाहीत. जिथे जेवेल तिथेच छेद करेल,” अशा शब्दांत त्यांनी तटकरेंवर निशाणा साधला. पुढे त्यांनी, “तटकरेंबाबत अधिक बोलणे योग्य ठरणार नाही,” असेही म्हटले. भास्कर जाधवांवरही निशाणा शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांच्या वक्तव्यांवरही रामदास कदम यांनी टीका केली. ते म्हणाले, “भास्कर जाधव यांच्या मनात सतत विरोधी पक्षनेतेपदाचेच विचार सुरू असतात. विधिमंडळात त्यांनी ज्या पद्धतीने भाष्य केले, ते पाहून वाईट वाटले. त्यांनी संयमाने बोलण्याची गरज आहे.” उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्व भूमिकेवर सवाल उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही कदम यांनी टीका केली. “जे काँग्रेससोबत गेले, सोनिया गांधींसोबत राजकारण केले आणि राहुल गांधींसोबत मैत्री दाखवली, त्यांनी आता हिंदुत्वाची भाषा करणे हा मोठा विनोद आहे. जनता सर्व काही पाहत आहे,” असा टोला त्यांनी लगावला. आशिष शेलारांच्या भेटीचे स्वागत भाजप नेते आशिष शेलार यांनी विरोधी पक्षाच्या आमदाराची घेतलेली भेट योग्य असल्याचे सांगत कदम म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भेट दिली असेल तर त्यात काहीही चुकीचे नाही. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशा भेटी होत असतात. त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे.” दरम्यान, जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री भेटीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र, या भेटीमागे कोणताही ठोस राजकीय निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, असे संकेत रामदास कदम यांनी आपल्या वक्तव्यातून दिले. हेही वाचा… अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार!:हसन मुश्रीफांचा ठाम दावा, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचेही कौतुक
महायुती सरकारमधील खातेवाटपाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक करत राज्यातून मुंबईला होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यात तब्बल 25 टक्क्यांनी घट झाल्याची माहितीही त्यांनी दिली. महायुतीतील खातेवाटपाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, “प्रसारमाध्यमांत अनेक चर्चा सुरू आहेत. शरद पवार गटातील आमदार-खासदार एनडीएमध्ये येणार, अशा बातम्या सुरू आहेत. मात्र भविष्यात काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल.” येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *