नांदेड (प्रतिनिधी)- केंद्र सरकारकडे सध्या दोन तृतीयांश बहुमत जमवण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींवर भाष्य करताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कोणताही पक्ष फोडत नाही, आमचे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत; मात्र एकदा कोणी आत आले की आम्ही ते दरवाजे बंद करतो, असे सूचक विधान त्यांनी नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी त्यांच्यासोबत आरपीआय (आठवले गट) चे विजयदादा सोनवणे, गौतम काळे, मिलिंद शिराढोणकर, उत्तम वावळे आणि बाबासाहेब कांबळे यांची उपस्थिती होती.
महिला आरक्षण आणि कायदेविषयक उद्दिष्टे: आगामी काळात दोन तृतीयांश संख्याबळ गाठून पुढच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन बिल पास करून घेण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे आठवले यांनी सांगितले. दक्षिणेतील राज्यांच्या जागा कमी होणार असल्याचा आरोप त्यांनी खोटा असल्याचे सांगत फेटाळून लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आरपीआयला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवून देणार: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या इतिहासाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, ३ ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापन झालेला हा पक्ष भारतीय जनता पक्षापेक्षाही जुना आहे. सध्या केवळ भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि बीएसपी यांनाच राष्ट्रीय पक्षाची मान्यता आहे. आता आरपीआयला देखील राष्ट्रीय स्तरावर राजकीय पक्षाची मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात असलेली गटबाजी दूर करून सर्वांना एकत्र करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
सामाजिक न्याय आणि बजेट: सामाजिक न्याय विभागासाठी यंदाच्या संकल्पात १ लाख ९८ हजार ४०४ कोटी रुपयांची भरीव तरतूद असल्याचे त्यांनी नमूद केले. अनुसूचित जाती-जमातीमधील उप-वर्गीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना आठवले म्हणाले की, हा विषय सरकारचा नसून न्यायालयाच्या आदेशानंतर समोर आला आहे.मातंग व इतर समाजाच्या मागणीनुसार, जातीच्या टक्केवारीप्रमाणे त्यांना वाटा मिळायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मणिपूर हिंसाचारावर भाष्य: मणिपूरमधील परिस्थितीवर भाष्य करताना आठवले म्हणाले की, तिथे मैतेई आणि कुकी समाजामध्ये वैचारिक मतभेदामुळे हिंसाचार घडला आहे. मात्र, याचा अर्थ तिथे सामाजिक न्याय अस्तित्वात नाही असा होत नाही; सध्या तिथे परिस्थिती बरीच शांत असून सरकार शांततेसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
Post Views: 183
