![]()
आयुर्वेदात अनेक चमत्कार असले तरी ते अजूनही सामान्य माणसांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आयुर्वेदात अपार ताकद असून, त्याला कोणताही पर्याय नाही. केवळ भारतातच नव्हे, तर जगातही आयुर्वेद नंबर एक आहे. मात्र, त्यासाठी सामान्य माणसाने आयुर्वेदावर विश्वास ठेवून तो कृतीत उतरवला पाहिजे, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे यंदाचा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार मुंबईचे वैद्य नरेंद्र भट्ट यांना प्रदान करण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे हे ४१ वे वर्ष होते. याप्रसंगी वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, वैद्य विवेक साने, वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. मुख्य पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे होते. आयुर्वेद, वनस्पती शास्त्र, रसशास्त्र, चिकित्सा इत्यादी विविध आयामांमध्ये महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वैद्यांना वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रशांत दामले यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवाविषयी सांगितले की, नाटकाच्या कामामुळे त्यांचा दिनक्रम निसर्गाविरोधी असतो, ज्यामुळे शरीरावर परिणाम दिसू लागले होते. मात्र, २००८ पासून सातत्याने आयुर्वेदाचे पालन केल्यामुळे त्यांना आजपर्यंत पित्ताचा त्रास झाला नाही. आयुर्वेदात संयम महत्त्वाचा असून, तात्काळ परिणामांची अपेक्षा न करता सातत्य ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. आज मेडिकल कॉलेजसाठी ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो आणि डॉक्टर झाल्यानंतर तो खर्च वसूल करण्याची मानसिकता तयार होते. यामुळे आपण हॉस्पिटलच्या दृष्टचक्रात अडकतो. स्वतःची तब्येत स्वतः सांभाळणे गरजेचे आहे. आयुर्वेद आपल्याला स्वतःच्या शरीराची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकवतो, असे दामले म्हणाले. वैद्य नरेंद्र भट्ट यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आयुर्वेद पुनरुज्जीवित करायचा असेल, तर निसर्गाकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही. आयुर्वेद सांगतो की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, प्रत्येक प्रकृती स्वतंत्र आहे. त्यामुळे एकसारख्या उपचारांची चौकट आयुर्वेदाला मान्य नाही. आयुर्वेद वाचवायचा असेल, तर आयुर्वेदाचे रुग्णही डॉक्टर झाले पाहिजेत, म्हणजेच समाजाने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. आपली तंत्रे, आपली रचना, आपली संस्कृती आणि आपली शिक्षणपद्धती या सर्वांनी डॉक्टरांसारखा विचार केला पाहिजे. जर आपण सर्वांगीण आणि समग्र दृष्टिकोन ठेवला, तर एआयचा उपयोग आयुर्वेद आणि मानवतेच्या सेवेसाठी निश्चितच करता येईल. आयुर्वेद क्षेत्रातही गुंतवणूक अपरिहार्य असून, ती गुंतवणूक विश्वास आणि विकास या दोन पातळ्यांवर असली पाहिजे, कारण शेवटी ही गुंतवणूक रुग्णासाठी असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुर्वेदावर विश्वास ठेवा, प्रशांत दामले यांचे आवाहन:वैद्य खडीवाले संस्थेतर्फे वैद्यकीय पुरस्कार प्रदान
