![]()
मुंबई–पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या सुमारे ३० रेल्वे गाड्या रद्द असल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तातडीने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून या मार्गावर दररोज २०० अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या विशेष नियोजनाअंतर्गत ई-शिवनेरीच्या ३१२ नियोजित फेऱ्या सह साध्या बसेसच्या २०० जादा फेऱ्या मुंबई–पुणे मार्गावर दररोज चालविण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय, प्रवाशांची प्रत्यक्ष गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार आणि विभागांना आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवाशाला वाहतुकी अभावी अडचण येऊ नये, यासाठी एसटी प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “संकटाच्या प्रत्येक काळात एसटीने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे. रेल्वे सेवा बाधित झाल्यानंतरही प्रवाशांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी एसटी महामंडळ पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. प्रवाशांची सुरक्षितता, सोय आणि वेळेवर सेवा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, गरजेनुसार आणखी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल.” रेल्वे सेवा प्रभावित झालेल्या परिस्थितीत एसटीची ही अतिरिक्त सेवा लाखो प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, मुंबई–पुणे मार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. हे ही वाचा… पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी:डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने 10 जुलै ते 17 जुलै 2026 या कालावधीत अनेक नियमित आणि विशेष एक्स्प्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एसटीचा दिलासा:उद्यापासून 200 अतिरिक्त बसफेऱ्या सुरू, 30 रेल्वेगाड्या रद्द झाल्याने तातडीची उपाययोजना
