![]()
स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे काम कधीच झाले नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आपल्याकडे अनेक महत्त्वाची कामे झाली, परंतु त्यांचे दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) केले गेले नाही. त्यामुळे आपल्याला इंग्रजा
.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी २१ पानांचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे, तर मुघलांचा इतिहास एका पानावर आणला गेला आहे. जगाचा इतिहास बदलण्याचे काम आपण आपल्या विविध दस्तऐवजांमधून पुराव्यानिशी करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
ते पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत ‘युवा भारताच्या लोकसहभागाची “गिनीजगाथा”‘ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, आयोजक राजेश पांडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, प्रसेनजीत फडणवीस आणि ज्येष्ठ पत्रकार किरण कुमार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचन संस्कृतीला नवीन दिशा देण्याचे श्रेय पुणे पुस्तक महोत्सवाला दिले. पुणेकर कोणत्याही बौद्धिक कार्यक्रमाला नेहमीच पसंती देतात, हे यातून दिसून येते. पुस्तके आणि ज्ञान आपल्या जाणिवांचा विस्तार करतात, ज्यामुळे विचार आणि प्रगल्भता वाढते, असे ते म्हणाले.
पुणे पुस्तक महोत्सवाचा विस्तार आता इतर शहरांमध्येही होत आहे. नुकताच नागपूर येथे हा महोत्सव उत्साहात पार पडला असून, आता तो गोव्यातही आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्र शतकानुशतके सामाजिक सुधारणा आणि प्रगल्भतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजक राजेश पांडे यांच्या कार्याचे कौतुक केले. पांडे यांनी आतापर्यंत विविध १५ गिनीज विक्रम केले असून, ते सर्वाधिक गिनीज विक्रम करण्यात अग्रेसर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतानुसार, आपली लोकसंख्या ही आपली ताकद असून, ती कौशल्य आधारित असल्यास त्याचा देशाला मोठा फायदा होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.
यावेळी आयोजक राजेश पांडे यांनी सांगितले की, पुणे पुस्तक महोत्सवाला तीन दिवसांतच वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनेक पुस्तके संपण्याच्या मार्गावर आहेत. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. यावर्षी लिटरेचर फेस्टिवलचेही आयोजन करण्यात आले असून, त्यात देशभरातील नामवंत व्यक्ती सहभागी होत आहेत.
पांडे पुढे म्हणाले की, पुणेकरांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुस्तक महोत्सवात झालेल्या विविध गिनीज रेकॉर्डवर आधारित ‘गिनीजगाथा’ हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे अशी त्यांची इच्छा होती, जी आज पूर्ण झाली.
