शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणापासून ते पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण, महागाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान
.
राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले, “जे लोक राम मंदिरालाही लुटू शकतात, दानपेटीही सोडत नाहीत, त्यांच्यासोबत भांडीला मांडी लावून बसणार का?” असा थेट सवाल त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चेत असलेल्या नेत्यांना केला.
‘शरद पवार गटाचा निर्णय त्यांचा, आमची भूमिका स्पष्ट’
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, तो निर्णय संबंधित पक्षाचा आहे. “आम्ही आमची भूमिका नेहमी स्पष्ट आणि परखडपणे मांडत आलो आहोत. आम्ही जनतेच्या बाजूने उभे आहोत,” असे त्यांनी सांगितले.
‘महागाई, पाणीटंचाई, वीज कपात; जनतेचा संताप वाढतोय’
राज्यातील परिस्थितीवर टीका करताना त्यांनी महागाई, पाणीटंचाई, वीज कपात यांसारख्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. “देशभरात लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत. जनतेचा राग व्यक्त होत आहे. अशा वेळी भाजपसोबत जाण्याचा विचार करणाऱ्यांनी जनतेसमोर उत्तर द्यावे,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘फ्रस्ट्रेशन दिसत आहे’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणावरही आदित्य ठाकरे यांनी टीका केली. “काल दोन तासांहून अधिक वेळ भाषण करून त्यांनी विरोधकांवर टीका केली, पण त्यातून त्यांचे फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसत होते. अनेकदा अहंकार हा फ्रस्ट्रेशनचे लक्षण असतो,” असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राजकीय अंदाज व्यक्त करत, “कदाचित हे त्यांचे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अधिवेशन असेल. त्यांना दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात नेले जाऊ शकते,” असेही म्हटले.
‘प्रश्न विचारले तर धमक्या का?’
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विरोधकांना दिलेल्या इशाऱ्यावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “लोक प्रश्न विचारणारच. भ्रष्टाचार झाला असेल, अनियमितता झाली असेल तर त्याची उत्तरं द्यावी लागतील. महाराष्ट्राला धमकावून चालणार नाही. हिंदीत, इंग्रजीत किंवा कोणत्याही भाषेत धमक्या दिल्या तरी आम्ही प्रश्न विचारत राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘भाजप हिंदू आणि देशहिताच्या विरोधात’
भाजपवर अधिक आक्रमक होत आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही भाजपसोबत जाणार नाही. कितीही दबाव आणला तरी आमची भूमिका बदलणार नाही. भाजप हिंदूंच्या आणि देशहिताच्या विरोधात काम करत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
इथेनॉल मिश्रणावरूनही सरकारला घेरलं
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “इथेनॉलमुळे पेट्रोल स्वस्त होईल, असे आश्वासन दिले गेले होते. पण आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असूनही भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त झालेले नाही. जगभर इथेनॉल ब्लेंडिंगबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरीही हे धोरण रेटले जात आहे,” असे ते म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गावरून टोला
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “10-12 वर्षांपासून हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. आधी रस्ता नीट करून दाखवा. नाहीतर त्या खड्ड्यांमध्येच इथेनॉल टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न करा,” असा उपरोधिक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
संबंधित बातमी वाचा…
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत बघून घेईनची भाषा कशी?:’मिसिंग लिंक’ आणि राम मंदिर चोरीवरून राज ठाकरेंची महायुती सरकारवर सडकून टीका

“पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या मुद्द्यावरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देख लुंगा’ अशी भाषा वापरतात आणि चक्क हिंदीतून बोलतात. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, समोर बसलेले आमदार मराठी आहेत, मग तुम्ही विधानसभेत हिंदीतून कुणाला दम देत आहात? दिल्लीत बसलेल्या तुमच्या पक्षातील वरिष्ठांना संदेश द्यायचा आहे का?” अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. येथे वाचा संपूर्ण बातमी
महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज, हे बिनकामाचे सरकार:मुख्यमंत्र्यांच्या ‘देख लुंगा’ भाषेवरून विरोधक आक्रमक

पावसाळी अधिवेशनात पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ला पडलेले खड्डे आणि पावसातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर बोलताना काल (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून “भाडे के टट्टू” आणि “देख लुंगा” अशा आक्रमक शब्दांत उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषेवरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून संजय राऊत, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
गद्दाराच्या छताखाली बैठका कशासाठी?:शरद पवारांना बैठकीसाठी अख्खे विधान भवन काय ओस पडले होते? पवारांच्या बैठकीवरून राऊतांचा टोला

शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, यात शंका नाही. मात्र, ज्यांनी आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने नेत्यांची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची कीड लावली आहे. पवारांना बैठकीसाठी अख्खे विधानभवन काय ओस पडले होते का? समोरच वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी भवन असताना गद्दाराच्या दारात जाणे आम्हाला पटत नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
