![]()
.
राज्यातील ५० पेक्षा जास्त दिव्यांगांनी ५४०० फूट उंचीच्या कळसुबाई शिखरावर चढाई करत थर्टी फर्स्टचा अनोखा अनुभव घेतला. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या या शिखरावर त्यांनी नववर्षाचे स्वागत केले. शिवुर्जा प्रतिष्ठान या दिव्यांगांच्या दुर्ग भ्रमण संवर्धन संस्थेच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून ही ऊर्जा मोहीम राबवली जाते. यंदाही ३१ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, बुलढाणा, सातारा, जळगाव, अकोला, हिंगोली, अमरावती, धुळे, लातूर येथून दिव्यांग आणि त्यांचे मदतनीस बारी गावात एकत्र आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि सचिव कचरू चांभारे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी एक वाजता चढाईला सुरुवात झाली. खाचखळगे, झाडी, डोंगरदऱ्या, लोखंडी शिड्या, निसरड्या वाटा पार करत सर्वांनी एकमेकांच्या मदतीने पाच तासांत शिखर गाठले. ३१ डिसेंबरची रात्र त्यांनी कडाक्याच्या थंडी आणि सोसाट्याच्या वाऱ्यात कापडी तंबूत घालवली. एक जानेवारीला सूर्योदय पाहून नववर्षाचे स्वागत केले. सकाळी दहा वाजता शिखर उतरण्यास सुरुवात झाली. तीन तासांत सर्वजण सुखरूप बारी गावात पोहोचले. बारी आणि जहागीरदारवाडी गावकऱ्यांनी या दिव्यांग वीरांचे स्वागत केले. बारीचे सरपंच वैशाली खाडे, उपसरपंच गणेश खाडे, सदस्य रोहिणी खाडे, जहागीरदारवाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे, उपसरपंच रुक्मिणी करटुले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे आणि सचिव कचरू चांभारे यांच्या हस्ते सर्व दिव्यांग आणि मदतनिसांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कळसुबाई शिखरावर नवीन वर्षाचे स्वागत करताना ५० दिव्यांग. छाया ः विनोद लोहिया.
