![]()
चांदूर बाजार तालुक्यातील १० हजार शेतकरी अतिवृष्टीच्या निधीपासून वंचित असल्याने संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लोक विकास संघटनेच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी आमदारांच्या कार्यालयासमोर ‘डफली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी आणि
.
जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने अतिवृष्टी जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेला अनेक महिने उलटूनही चांदूर बाजार तालुक्यातील दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीचा निधी मिळालेला नाही.
लोक विकास संघटनेच्या मते, शासनाने सांगितलेल्या सर्व प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या आहेत. केवायसी प्रक्रिया वारंवार पूर्ण करूनही, तसेच बँक खाते आणि कागदपत्रे अचूक असूनही, मंजूर निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची कुचंबना सुरू आहे.
या गंभीर प्रश्नावर लोक विकास संघटनेने तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नाही. मंजूर अतिवृष्टीचा निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यापूर्वी सर्व उपाय संपल्यानंतर स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांना खुले पत्र देऊन शेतकऱ्यांना मंजूर निधी मिळवून देण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंतीनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच आज लोक विकास संघटनेने आमदार प्रवीण तायडे यांच्या कार्यालयापुढे ‘डफली बजाओ’ आंदोलन करून त्यांना या जुन्याच मुद्द्याची आठवण करून दिली. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
