नांदेड (प्रतिनिधी): नांदेड-लातूर मार्गावरील श्री गुरु गोविंद सिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालय (SGGS) समोरील उड्डाणपुलाच्या एका भागाला खच पडल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
विशेष म्हणजे, भविष्यातील अभियंते घडविणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरच उड्डाणपुलाला खच पडल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संबंधित बांधकामाची गुणवत्ता, देखभाल आणि कामाच्या अंमलबजावणीची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या मार्गावर मोठी वाहतूक होत असून विष्णुपुरीसह अनेक रुग्णालयांकडे जाण्यासाठीही हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे पुलाच्या खचलेल्या भागामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंत्राटदार, कामाची गुणवत्ता तपासणाऱ्या यंत्रणा आणि देखभाल करणाऱ्या विभागाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. पुलाच्या बांधकामादरम्यान आवश्यक दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते का, कामाची गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आली होती का, तसेच देखभाल वेळेवर झाली होती का, याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही काँक्रीटच्या बांधकामासाठी योग्य दर्जाचे क्युरिंग (पाणी देण्याची प्रक्रिया) अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या पुलाच्या बांधकामादरम्यान आणि त्यानंतर क्युरिंगचे काम नियमानुसार झाले होते का, याचीही स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
नागरिकांनी या घटनेची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच पुलाची सुरक्षितता तपासून आवश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
Video link : https://www.instagram.com/p/DakCsGmxEl1/
