रायगडमध्ये पुराचा कहर!:एचपीसीएल प्रकल्पातील हजारो LPG सिलिंडर नदीत वाहून गेले; थरारक व्हिडिओ समोर




रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एलपीजी बॉटलिंग प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आहे. पुराच्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्याने हजारो गॅस सिलिंडर नदीत वाहून गेल्याने प्रशासनासह स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले आहे. पाण्याचा वेगवान प्रवाह अन् ३,००० सिलिंडर नदीत गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत भयानक वाढ झाली आहे. याच पुराच्या पाण्याचा मोठा फटका पनवेलच्या चावणे एमआयडीसीमधील एचपीसीएल कंपनीच्या गॅस बॉटलिंग प्लांटला बसला. पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की, प्लांटमध्ये ठेवलेले भरलेले आणि रिकामे असे एकूण सुमारे ३,००० एलपीजी गॅस सिलेंडर थेट पाताळगंगा नदीच्या पात्रात वाहून गेले. पुराच्या पाण्यात शेकडो गॅस सिलिंडर वाहून जात असल्याचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ‘सिलिंडरच्या मोहात पडू नका, जीव धोक्यात घालू नका’ ही अत्यंत गंभीर आणि स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. नदीपात्रात किंवा किनार्‍यावर असे गॅस सिलिंडर वाहून आल्यास ते अत्यंत धोकादायक ठरू शकतात. याबाबत इशारा देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, “नदीच्या प्रवाहात वाहत आलेल्या सिलिंडर मध्ये नेमका किती गॅस शिल्लक आहे, तसेच ते आतून सुरक्षित आहेत की नाही? याची कोणतीही शाश्वती नसते. त्यामुळे केवळ उत्सुकतेपोटी किंवा फुकट गॅस मिळत असल्याच्या घरगुती वापराच्या मोहाने हे सिलिंडर उचलणे, त्यांच्याशी छेडछाड करणे किंवा ते स्वतःच्या घरी घेऊन जाणे अत्यंत जीवघेणे ठरू शकते. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून ही जोखीम पत्करू नये.” शोधमोहीम सुरू; सिलिंडर आढळल्यास काय करावे? या घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा आणि एचपीसीएल कंपनीचे अधिकारी तातडीने कामाला लागले असून, वाहून गेलेल्या सिलिंडरचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. पाताळगंगा नदीच्या प्रवाहाच्या दिशेने हे सिलिंडर खालापूर, पेण आणि आसपासच्या किनारी भागातील गावांमध्ये वाहून जाण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. सिलिंडर आढळल्यास संपर्क करा जर कोणत्याही नागरिकाला नदीपात्रात किंवा नदीच्या काठावर असे गॅस सिलिंडर आढळून आले, तर त्यांनी ते अजिबात स्वतःकडे ठेवू नयेत. त्याऐवजी, सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्काळ एचपीसीएल कंपनी, जवळचे अधिकृत गॅस वितरक किंवा खालापूर व पेण येथील तहसीलदार कार्यालयात ते जमा करावेत, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. हेही वाचा.. मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका, अद्याप 6 ते 7 जण अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी दुपारी अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा महाकाय डोंगर शेजारील प्रशासकीय इमारतीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकले होते. कालपासून सुरू असलेल्या युद्धपातळीवरील बचावकार्याला आता मोठे यश आले असून, आतापर्यंत एकूण ९ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्यापही ६ ते ७ जण या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर वाचा.. राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भात विश्रांती, तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना महत्त्वाचा इशारा गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी, धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील १७ जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा कायम ठेवला असून, यामध्ये २ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर १५ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. सविस्तर वाचा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *