वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती, 'आरोग्य संपन्न वारी' मोबाईल ॲपचे लाँचिंग




आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त संजय काटकर यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “वारकरी वारीसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्या नियोजनाप्रमाणे सर्व सेवा पुरवाव्यात. वारी कालावधीत भाविकांना डिजिटल आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. ‘आरोग्य संपन्न वारी’ व ‘वारी सहाय्य’ या माध्यमातून पालखी मार्गावर वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून, यामध्ये प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्यामार्फत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.” “वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा पुरवताना कोणतीही उणीव राहू नये. वारी कालावधीत आरोग्य सुविधा देण्यासाठी पंढरपूर येथील स्थानिक डॉक्टरांची उपलब्धता राहण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात. पालखी मार्गावरील तसेच शहरातील खासगी वैद्यकीय रुग्णालयांतील दहा टक्के खाटा आरक्षित करण्यात येणार आहेत. खासगी डॉक्टरांना आरोग्य सेवा देण्याचे आवाहन आपण करतो, त्यामुळे सरकारी डॉक्टरांनीही अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने सेवा द्यावी. वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात सार्वजनिक आरोग्य विभाग कुठेही कमी पडता कामा नये.”, असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागाने यंदाच्या आषाढी वारीत गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा आणि ‘आरोग्यसंपन्न वारी’ मोबाईल ॲप ही आरोग्य व्यवस्थेची दोन महत्त्वाची साधने उपलब्ध करून दिली आहेत. मोबाईल ॲपच्या माध्यमातून वारकऱ्यांना पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा, उपचार केंद्रे व तातडीच्या वैद्यकीय सेवांची माहिती सहज उपलब्ध होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी विभागामार्फत वारीसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना तसेच नियोजनाविषयी माहिती दिली. तत्पूर्वी,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी औंध येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सेवांचा आढावा घेतला आणि रुग्णांशी संवाद साधून आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या मुक्काम स्थळी भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. त्याचप्रमाणे मुक्काम स्थळावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, विहिरी तसेच रेस्टॉरंट यांचीही पाहणी केली. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्र तसेच पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सेवांचा आढावा घेतला. वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा – पालखी मार्गावरील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण.
– डेंग्यू, मलेरिया आदी कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना.
– पालखी मार्गावरील हॉटेल, ढाबे व उपहारगृहांतील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व उपचार.
– वारीनंतर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विशेष स्वच्छता अभियान.
– असंसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन व उपचार सुविधा.
– पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवांसाठी १० टक्के खाटा राखीव.
– पालखी मार्गावर ४३ ठिकाणी सुसज्ज आयसीयू सुविधा.
– पालखी मार्गावर १५६ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मार्फत प्राथमिक उपचार केंद्रे.
– वारकऱ्यांच्या सेवेसाठी २१५ आरोग्यदूतांची नियुक्ती.
– पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागात १६ आयसीयू कक्ष आणि १७ तात्पुरते ‘ आपला दवाखाना’ सुरू.
– विठ्ठल मंदिर परिसरात २४x७ सुसज्ज आयसीयू कक्ष कार्यरत.
– पंढरपूर व माळशिरस ग्रामीण भागात अतिरिक्त ५ आयसीयू कक्ष.
– पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका (३८ ALS, ७३ BLS आणि ‘१०२’ क्रमांकाच्या २४२ रुग्णवाहिका) तैनात.
– गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध.
– प्रत्येक दिंडी प्रमुखास प्राथमिक उपचार औषध संचाचे वितरण.
– सेवेसाठी ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती.
– पंढरपुरात तीन दिवस २४x७ महाआरोग्य शिबिर, सर्व तज्ज्ञ सेवा व ५ खाटांचे आयसीयू.
– पालखी मार्गावरील सर्व आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका व उपचार केंद्रांचे डिजिटल मॅपिंग.
– ‘आरोग्यसंपन्न वारी’ मोबाईल ॲपद्वारे तात्काळ आरोग्य सुविधांची माहिती.
– महाआरोग्य शिबिरात वारकऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *