कर्नाटकने दुष्काळ जाहीर केला, महाराष्ट्र 5 ऑक्टोबरची वाट का पाहतोय?:शेतकऱ्यांची थट्टा करू नका; रोहित पवारांची सरकारवर टीका

[ads1]


राज्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा भीषण परिस्थितीत राज्य सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “शेजारचे कर्नाटक सरकार जर दुष्काळ जाहीर करून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवू शकते, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ५ ऑक्टोबरची वाट का पाहत आहेत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कर्नाटकचा कित्ता महाराष्ट्र का गिरवत नाही? कर्नाटक सरकारच्या तत्परतेचा दाखला देत रोहित पवार म्हणाले, “शेजारच्या कर्नाटक सरकारने २८ ऑगस्ट रोजीच १०१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला. काल नव्याने आणखी २३ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे घोषित करून त्यांनी केंद्राकडे ‘एनडीआरएफ’च्या (NDRF) मदतीसाठी प्रस्तावही पाठवला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती कर्नाटकापेक्षा वेगळी नाही. खरीप हंगाम हातातून गेल्याने येथील शेतकरी संकटात आहे, तरीही सरकार दुष्काळ जाहीर का करत नाही?” VEDAS च्या आकडेवारीनुसार २८० तालुके दुष्काळग्रस्त दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक निकषांची (ट्रिगर्स) माहिती देताना त्यांनी केंद्र सरकारच्या ‘वेदास’ (VEDAS) उपग्रहाच्या आकडेवारीचा संदर्भ दिला. “सद्यस्थितीला महाराष्ट्रातील २०३ तालुक्यांमध्ये पावसाची तूट (Rainfall Deviation) दिसून येत आहे. १४० तालुक्यांमध्ये पावसाची तूट आणि ४ आठवड्यांचा पावसाचा खंड आहे. तर तब्बल २८० तालुक्यांमध्ये पावसाची तूट आणि ३ आठवड्यांचा पावसाचा खंड आहे. हे सर्व निकष दुष्काळ जाहीर करण्यासाठी पुरेसे आहेत,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. ५ ऑक्टोबरची मुदत हा निव्वळ भ्रम रोहित पवार म्हणाले, “तत्काळ दुष्काळ घोषित करणे गरजेचे असताना मुख्यमंत्री साहेब ५ ऑक्टोबरच्या मुदतीचा भ्रम पसरवत आहेत. वास्तविक, दुष्काळ घोषित करण्याचा आणि ५ ऑक्टोबरचा काडीमात्र संबंध नाही. कर्नाटक सरकार जर आत्ताच प्रस्ताव पाठवू शकते, तर आपण का नाही?” देवेंद्र फडणवीसांना टोला अन् सरकारला इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, “प्रत्येक बाबतीत अटीशर्ती टाकण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात कुणीच धरू शकत नाही. परतीच्या पावसात थोडाफार पाऊस पडल्यास बऱ्याच भागात दुष्काळ घोषित करण्याची गरज पडणार नाही आणि सरकारचा पैसा वाचेल, असा जर मुख्यमंत्री आणि त्यांच्या ‘मित्रा’च्या टीमचा कयास असेल, तर ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. अडचणीत सापडलेला बळीराजा सरकारला कदापि माफ करणार नाही,” असा संतप्त इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. रोहित पवारांची पोस्ट.. हेही वाचा.. नवी मुंबईत 1 लाख विद्यार्थ्यांसाठी ‘एज्युसिटी’ उभारणार:तर 5 ऑक्टोबरनंतर दुष्काळाचे पंचनामे सुरू करणार असल्याची फडणवीसांची माहिती राज्यातील दुष्काळी परिस्थिती, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत परदेशी विद्यापीठांचे आगमन आणि विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले. राज्यात ५ ऑक्टोबरनंतर दुष्काळाचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’ची (NDRF) मदत मिळवून दिली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. तसेच, नवी मुंबईत भव्य ‘एज्युसिटी’ उभारली जात असून, राहुल गांधी हे अराजकतावादी मानसिकतेतून लोकशाही संस्थांवर आरोप करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. सविस्तर वाचा

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *