![]()
रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता टोकाचा आणि हिंसक वळणावर पोहोचला आहे खोपोली येथील शिवसेनेच्या महिला नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरचौकात निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण जिल्हा हाद
.
आमदार महेंद्र थोरवे यांनी काळोखे हत्याकांडप्रकरणी सुनील तटकरेंवर खळबळजनक आणि गंभीर आरोप केलेत. आरोपी रवींद्र देवकर याने हत्येच्या चार-पाच दिवसांपूर्वी सुतारवाडी येथे जाऊन सुनील तटकरे यांची भेट घेतली होती, असा दावा महेंद्र थोरवे यांनी केला आहे. “रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी रक्तरंजित राजकारण सुरू केले असून विरोधकांच्या हत्या त्यांच्या सांगण्यावरून केल्या जात आहेत. तटकरे हेच रायगडचा ‘आका’ बनले आहेत,” असा खळबळजनक आरोप महेंद्र थोरवे यांनी केला.
पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाचा इशारा
या हत्येत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचाही सहभाग असून, सुधाकर घारे आणि रवींद्र देवकर यांनी ‘प्री-प्लॅन’ करूनच मंगेश काळोखे यांना संपवल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे. जोपर्यंत सुधाकर घारेसह 10 आरोपींना अटक होत नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाही. याप्रकरणी पोलिस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही थोरवे दिला आहे.
शिंदेंनी घेतली काळोखे कुटुंबीयांची भेट
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काळोखे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्र्यांना पाहताच कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले. “आरोपींवर मकोका लावा आणि त्यांना फाशीची शिक्षा होईल असे पहा,” अशी आर्त साद काळोखे कुटुंबाने घातली. यावर शिंदे यांनी अत्यंत कठोर भूमिका मांडली. “काळोखे कुटुंब हे शिवसेनेचे कुटुंब आहे. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या हत्याकांडातील एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाला दिला.
नगरपालिका निवडणुकीची किनार?
रायगडमध्ये नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडल्या असून, निकाल लागल्यानंतर काहीच दिवसांत हे हत्याकांड घडल्याने याला राजकीय किनार असल्याचे स्पष्ट होत आहे. मंगेश काळोखे यांची हत्या भरचौकात करण्यात आली, ज्यामुळे खोपोली शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शिवसेनेने या हत्येसाठी थेट राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना जबाबदार धरल्यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन मित्रपक्षांमधील दरी आता आणखी रुंदावली आहे.
