![]()
माळीनगर येथील सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या आर्थिक व प्रशासकीय कारभारावरून संस्थेमध्ये वाद निर्माण झाला असून, काही संचालकांनी विविध मागण्यांसाठी सलग आठ व्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची धर्मादाय आयुक्तांकडून सखोल चौकशी करून विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, संस्थेच्या प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावत संस्थेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संचालक रत्नदीप बोरावके, अविनाश जाधव, अजय गिरमे आणि कल्पेश पांढरे हे धरणे आंदोलन करत आहेत. या वादामुळे विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना वस्तुस्थिती समोर यावी आणि वादावर पडदा पडावा, यासाठी धर्मादाय विभागाने निष्पक्ष चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या आंदोलनकर्ते आणि संस्था प्रशासन दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असून, आता या प्रकरणात धर्मादाय आयुक्त कार्यालय कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनकर्त्यांचे सर्व आरोप निराधार – राजेंद्र गिरमे मात्र संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी आंदोलनकर्त्यांचे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले. गेल्या ७५ वर्षांपासून संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, काही व्यक्तींकडून संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार नियमानुसार होत असून आवश्यक कागदपत्रे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सासवड माळी एज्युकेशन सोसायटीत आर्थिक कारभारातून उफाळला वाद:चौकशीसाठी संचालकांचे पाचव्या दिवशीही धरणे आंदोलन
