महान परिसरात सोयाबीन पेरणीला वेग:खरीपाची लगबग सुरू, यंदा कपाशीला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती‎




महान आणि परिसरात खरीपाच्या सोयाबीन पेरणीने आता वेग घेतला असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सद्यस्थितीत केवळ बोटावर मोजण्याइतकीच म्हणजेच अवघी पाच टक्के पेरणी शिल्लक राहिली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपली कामे आटोपली आहेत. यंदा मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र, पावसाळ्याच्या तब्बल १७ दिवसांनंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. २५ जूननंतर झालेल्या जोरदार पावसामुळे महान परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना वेगाने सुरुवात केली. त्यानंतर अधूनमधून येणाऱ्या पावसाचा अंदाज घेत आणि ढगाळ वातावरण पाहता कोरडवाहू जमिनीतही शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर पेरणीसाठी एकच घाई केली होती. परिसरातील सुमारे ९५% शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारीची पेरणी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, यंदा महान परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी पिकाला अधिक पसंती देत मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली आहे. शिल्लक राहिलेले ५% शेतकरीही सध्या पेरणीची कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *