Pragya Satve Quits Congress Joins BJP; Hingoli Development Reason Explained | प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला का सोडली?: हिंगोलीच्या विकासाचे दिले कारण; सोनिया, राहुल गांधी आजही दैवत असल्याचाही दिला दाखला – Maharashtra News



काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी आपण हिंगोलीच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात चौफेर विकास करत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही भाजपल

.

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या पक्षप्रवेशावर बोलणे टाळले. पण आज हिंगोलीत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपले मन मोकळे केले. त्या म्हणाल्या, मी फक्त हिंगोलीच्या विकासाच्या ध्यासापोटी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने मला दोनवेळा विधानपरिषदेची संधी दिली. त्यासाठी मी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची आभारी आहे. हे दोघे आजही माझ्यासाठी दैवत आहेत.

भाजप कार्यकर्त्यांनी आज आमचे आनंदाने स्वागत केले. त्यांचे आमच्या कुटुंबावर असणारे प्रेम पाहून मी भारावले. हिंगोलीचा विकास हाच आमचा एमकेव ध्यास आहे.

काँग्रेसच्या आमदारकीवर पाणी का सोडले?

यावेळी प्रज्ञा सातव यांना तुमच्या आमदारकीचा बराच मोठा कालावधी शिल्लक असताना तुम्ही त्यावर पाणी का सोडले? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, तुम्ही जिल्ह्यातील परिस्थिती पाहत असाल. आम्हाला विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे. शेतकऱ्यांच्या व सिंचनाच्या बाबतीतही विकास साधायचा आहे. आमचे बरेच कार्यकर्ते विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. देवाभाऊ राज्यभर चौफेर विकास करत आहेत. त्यांनी उभारलेल्या समृद्धी महामार्गामुळे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात मुंबईला पोहोचले. याच विकासाच्या कामात आम्हाला हातभार लावायचा आहे.

सोनिया, राहुल गांधी माझे दैवत

त्या म्हणाल्या, काँग्रेसने मला दोनवेळा विधानपरिषदेवर पाठवले. मी हे नाकारत नाही. मला सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यामुळे आमदारकी मिळाली. ते दोघेही माझ्यासाठी दैवत आहेत. राजीव सातव व रजनी सातव यांच्यासारखेच हे दोघेही माझ्या मनात कायम राहतील. ते माझे दैवत आहेत. मी भाजपमध्ये प्रवेश करताना देवेंद्र फडणवीस व भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे कोणतीही मागणी केली नाही. मी स्वखुशीने या पक्षात आले. मी आता भाजप कार्यकर्ती म्हणून काम करणार आहे.

सतेज पाटलांना विरोधीपक्षनेतेपद मिळू नये म्हणून भाजपच्या गळाला?

सतेज पाटलांना विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून भाजपने मला गळाला लावले या चर्चेत तथ्य नाही. मला त्याविषयी काही माहितीही नाही. आत्ताच विधानपरिषदेचे अधिवेशन झाले. आमच्याकडे संख्याबळ असते तर याच अधिवेशनात विरोधी पक्षनेता दिसला असता, असे प्रज्ञा सातव म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *