![]()
अमरावती जिल्ह्यात रविवारी देशव्यापी पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत १ लाख ४५ हजार ५४० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना ‘दो बूंद जिंदगी के’ पाजण्यात आले. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात एकूण १ हजार ९९८ बूथ कार्यान्वित करण्यात आले होते. यामध्ये ४ हजार ७८७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच, मोहिमेच्या पर्यवेक्षणासाठी १४ तालुक्यांसाठी जिल्हास्तरावरील १० स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या बूथमध्ये १ हजार ९१२ प्रमाणित (स्थिर) बूथ, २२५ ट्रान्झिट बूथ (अस्थिर पथके), १८१ मोबाईल पथके आणि ८०१ अतिगर्दीच्या ठिकाणांवरील विशेष बूथ यांचा समावेश होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या हस्ते अमरावती तालुक्यातील शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेची सुरुवात केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. पराग राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा सूर्यवंशी, साथरोग अधिकारी डॉ. सुमीत राऊत, जिल्हा गुणवत्ता समन्वयक डॉ. मंगेश राऊत तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांनी केले, तर वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे यांनी संचालन केले आणि आरोग्य सहायक योगेश गवई यांनी आभार मानले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व आरोग्य सहाय्यक, सहायिका, आरोग्य सेवक-सेविका, परिचर, वाहन चालक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांनी अथक परिश्रम घेतले. भारताला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात पोलिओचा शेवटचा रुग्ण सप्टेंबर २०१० मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता, तर देशातील शेवटचा रुग्ण जानेवारी २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये नोंदविण्यात आला होता. त्यानंतर २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले. मात्र, शेजारील काही देशांमध्ये अद्यापही पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने देशात या आजाराचा प्रसार होण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
अमरावतीत 1.45 लाख बालकांना पोलिओ डोस:देशव्यापी मोहिमेत 4787 अधिकारी-कर्मचारी, 1912 पथके तैनात
