या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ३ लाख ८८ हजार ५१६ बालकांपर्यंत पोहोचून त्यांना पोलिओचे संरक्षणात्मक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. मागील मोहिमेतील कामगिरीचा विचार करून लाभार्थी बालकांची संख्या निश्चित करण्यात आली असून, जिल्हाभरात २ हजार ८३६ पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत. प्रत्येक बूथवर आवश्यक मनुष्यबळ व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बूथवर येऊ न शकणाऱ्या बालकांसाठी घरोघरी भेट देणारी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके निश्चित कालावधीत घरांपर्यंत पोहोचून लसीकरण पूर्ण करतील.
याशिवाय, रेल्वे स्थानक, बसस्थानके आणि तपासणी नाक्यांवर ट्रान्झिट टीम्स कार्यरत राहतील. भटक्या आणि बेघर कुटुंबातील मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल टीम्स तसेच नाईट टीम्स देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
लसीकरणासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालये सक्रिय करण्यात आली असून, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांकडून संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवली जाणार आहे. लसीची गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी कोल्ड चेन इक्विपमेंट, व्हॅक्सीन करिअर, कोल्ड बॉक्स आणि आयस पॅक यांची आवश्यक तयारी करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, एकही बालक सुटणार नाही, पोलिओ पुन्हा उद्भवणार नाही! या संदेशानुसार आपल्या परिसरातील ० ते ५ वर्षांखालील सर्व बालकांना जवळच्या पल्स पोलिओ बूथवर नेऊन पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजावेत आणि राष्ट्रीय मोहिमेला सहकार्य करावे.
