महापालिका क्षेत्रात आजपासून 15 मेपर्यंत स्वगणना उपक्रम:आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांची माहिती; नागरिकांसाठी मार्गदशर्क सूचना जारी
![]()
महानगरपालिका क्षेत्रात २०२६ ची जनगणना १ मे २०२६ रोजी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात नागरिकांना १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना करण्याची संधी दिली जाईल. यानंतर, १६ ते १४ मेदरम्यान गणक आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन ३३ प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलीत करतील. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ही जनगणना प्रक्रिया सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. सर्वप्रथम, महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेसाठी घरनिहाय (ब्लॉक) यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये जास्तीत जास्त २०० कुटुंबे, म्हणजेच ८०० लोकांचा समावेश आहे. पूर्व विभागात २८०, पश्चिम विभागात २४५, उत्तर विभागात १३६ आणि दक्षिण विभागात २४० अशा एकूण ९०१ घरनिहाय याद्या (घरगट) तयार करण्यात आल्या आहेत. जनगणनेच्या कामासाठी ९९३ प्रगणक आणि १६८ पर्यवेक्षकांसह एकूण १,१६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र जनगणना संचालनालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षण दिले जात आहे. २३ ते २५ एप्रिल आणि २७ ते ३० एप्रिल, २०२६ या कालावधीत ८०० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले तर प्रशिक्षणाचा अंतिम टप्पा ४ ते ६ मे२०२६ दरम्यान आयोजित केला जात आहे. या प्रक्रियेत सतरा प्रादेशिक प्रशिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जनगणनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांनी गणकांना अचूक आणि नेमकी माहिती देण्याचे आवाहन मनपा आयुक्त लहाने यांनी केले आहे. उष्णतेचा विचार करता, हे काम सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रांमध्ये हे काम केले जाईल. या उपक्रमाची जागरूकता निर्माण करण्यासाठी, कचरा गोळा करणाऱ्या वाहनांवर गाणी वाजवली जात आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी होर्डिंग्जद्वारेही माहिती दिली जात आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलिस विभागाच्या सहकार्याने जनगणना केली जाईल. प्रशासनाने हे देखील स्पष्ट केले आहे की, केवळ कुटुंबप्रमुखानेच माहिती द्यावी, जेणेकरून प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही. याशिवाय, कोणाचीही दोनदा गणना होणार नाही याची खात्री करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. या वेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाईल. सीएमएमएस पोर्टल अंतर्गत एचएलओ ॲप्लिकेशनद्वारे माहिती गोळा केली जाईल. तसेच सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला जनगणना विभाग प्रमुख अनिल बिडवे, मनपा उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी दिलीप जाधव, चार्ज अधिकारी विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, राजेश सरप, गजानन घोंगे, मनपा सचिव अमोल डोईफोडे, तांत्रिक अधिकारी चंदन प्रसाद, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा आदींची उपस्थिती होती. स्व-जनगणनेसाठी पोर्टलवर नोंदवा आपली माहिती स्व-जनगणनेसाठी, नागरिक https://se.census.go v.in या पोर्टलवर आपली माहिती नोंदवू शकतात, त्यानंतर त्यांना ११-अंकी युनिक आयडी मिळेल. जेव्हा गणक त्यांच्या घरी भेट देतील. तेव्हा त्यांना हा आयडी दाखवणे आवश्यक असेल. प्रशासनाने अखेरीस नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही संकोचाशिवाय जनगणनेत सक्रियपणे सहभागी व्हावे, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हे महत्त्वाचे कार्य यशस्वी होऊ शकत नाही. प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती वाढवून ही मोहीम सुरळीत आणि प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
