महाराष्ट्र दिन:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वीरांना सलाम; हुतात्मा स्मारकावर फडणवीसांची श्रद्धांजली, प्रगतीचा घेतला आढावा
![]()
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी राज्याच्या वैभवशाली परंपरेचा आणि विकासाच्या प्रवासाचा आढावा घेत राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्रमिक दिनाच्याही निमित्ताने कामगारांना कृतज्ञतेचा सलाम केला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा स्मारकावर उपस्थित राहून वीरांना श्रद्धांजली अर्पण करणे हा सन्मानाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेल्या ‘महाराष्ट्र धर्मा’च्या पायावर या राज्याची उभारणी झाली आहे. संत परंपरेने या संस्कृतीला व्यापक रूप दिले असून हीच परंपरा पुढे नेणारा महाराष्ट्र आजही प्रगतीच्या मार्गावर आहे. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनाच्या चळवळींचे नेतृत्व महाराष्ट्राने देशाला दिले आहे. आज राज्य देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असून ‘पावर इंजिन’ आणि ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून ओळखले जात आहे. विविध क्षेत्रांत सातत्याने होणाऱ्या प्रगतीमुळे महाराष्ट्राचा देशाच्या विकासात मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतील लोक भवन येथे राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वज फडकावला. या वेळी त्यांनी ध्वजाला सलामी दिली. कार्यक्रमात राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राज्यगीत सादर करण्यात आले. या सोहळ्यास राज्यपालांची पत्नी सुधा देव वर्मा, अधिकारी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते. इतिहास, संघर्ष आणि प्रगतीची आठवण करून देणारा दिवस मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरूनही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या प्रगतीबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, दूरदृष्टी आणि प्रगत विचारांच्या जोरावर महाराष्ट्र सतत पुढे जात आहे. तसेच त्यांनी श्रमिक दिनानिमित्त कामगारांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत, राज्याच्या विकासात त्यांची भूमिका मोलाची असल्याचे सांगितले. महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून इतिहास, संघर्ष आणि प्रगतीची आठवण करून देणारा दिवस असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
