दिल्लीत महिला साहित्य संमेलन; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल

0
WhatsApp-Image-2026-04-30-at-20.03.51.jpeg


नांदेड –  देशाची राजधानी नवी दिल्ली येथे दि. 11 व 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात नांदेड जिल्ह्याच्या डॉ. शारदा चोंडेकर यांनी आपल्या काव्यप्रतिभेने ठसा उमटवला. महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या या संमेलनात विविध राज्यांतील महिला अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला. ‘जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा’ या ब्रीदाखाली झालेल्या या उपक्रमात साहित्य आणि प्रशासन यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

किनवट सारख्या आदिवासी बहुल आणि दुर्गम भागात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शारदा चोंडेकर या संमेलनाच्या निमंत्रित प्रतिनिधी होत्या. बहिणाबाई चौधरी सभागृहात त्यांनी सादर केलेल्या काव्यमय अभिव्यक्तीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्या साहित्यकृतीतून उमटलेले संवेदनशील आणि सामाजिक भान असलेले विचार विशेष लक्षवेधी ठरले. त्यांच्या सहभागामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर ठळकपणे अधोरेखित झाले.

या संमेलनात देशभरातील महिला शासकीय अधिकारी सहभागी झाल्या होत्या. प्रशासनात कार्यरत असलेल्या महिलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात सरहद संस्था व नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त सचिव श्रीमती आर विमला यांनी केले होते. ग्रंथदिंडी, चर्चासत्रे, प्रकट मुलाखती आणि कविसंमेलने अशा विविध उपक्रमांद्वारे उत्साहात संपन्न झाले.

या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाध्यक्ष लीना मेहेंदळे, स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सरहद, पुणे’ आणि सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या पुढाकारात राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्त्री-अधिकाऱ्यांच्या साहित्य निर्मितीतून प्रशासन अधिक संवेदनशील, सृजनशील आणि लोककल्याणकारी होऊ शकते, हा विचार केंद्रस्थानी होता.सरकारी कामाच्या धकाधकीतही सर्जनशीलता जपणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरले. ग्रंथदिंडीपासून कविसंमेलनांपर्यंत विविध कार्यक्रमांनी या साहित्यिक मेळाव्याला वेगळी उंची दिली. महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याने मराठी वाङ्मय इतिहासात त्याचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे.

नांदेडचे प्रतिनिधित्व ठरले लक्षवेधी

डॉ. शारदा चोंडेकर यांच्या प्रभावी काव्यसादरीकरणामुळे नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विशेष लक्षवेधी ठरले. प्रशासन आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी साधलेला समतोल हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Post Views: 9






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed