वीज प्रश्नावरून महावितरणवरनगरसेवक अन् महिलांचा मोर्चा:महावितरण विभाग तक्रारी गांभीर्याने घेत नाही, नागरिकांचा आरोप
![]()
प्रतिनिधी | दर्यापूर शहरात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने सामान्य नागरिक विशेषत: लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दर्यापुरच्या नगरसेवकांनी आज, बुधवारी दुपारी थेट विद्युत वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. नगरसेवकांनी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निषेध म्हणून बेशरमचे झाड लावून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरण विभाग नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसून संपर्क साधण्यासही अडचणी येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात नगरसेविका नेहा देशमुख, वंदना सोलंकी, कविता गवई, मंदा इंगळे, वर्षा बोरेकर, मुनिफा बेग यांच्यासह इतर नगरसेवक आणि नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. दरम्यान नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात , अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही नगरसेवकांनी दिला. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून, पुढील दोन ते तीन आठवडे अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे. घर किंवा व्यावसायिक ठिकाणांमधील कचरा डीपीजवळ किंवा विद्युत तारांच्या खाली जाळणे टाळावे. अशा कृतीमुळे विद्युत पुरवठ्यात अडथळे निर्माण होतात. परिणामी तात्पुरता वीजपुरवठा खंडित करावा लागू शकतो. – सारंग गजभिये, सहाय्यक अभियंता (अर्बन एक)
