कोल्हापूरच्या बिंदु परिसरात तणाव!:संजय गायकवाडांच्या विधानावरून भाकप आक्रमक; मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
![]()
शिवसेना शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून अर्वाच्य व अत्यंत खालच्या पातळीच्या भाषेत शिवीगाळ केली होती. हा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली. तसेच संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आज कोल्हापुरात बिंदु चौकात भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. कोल्हापूर येथील बिंदू चौक परिसरात आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनामुळे मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाची दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आंदोलक आणि पोलिसांत मोठा राडा झाला. या घटनेमुळे बिंदू चौकातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस आणि भाकपच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट निदर्शने सुरू असतानाच भाकपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा बाहेर काढला, त्यावेळी तिथे उपस्थित पोलिसांनी तातडीने तो पुतळा ताब्यात घेतला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी कार्यकर्ते पुतळा दहन करण्यावर आडून बसले होते. बराच वेळ दोन्ही बाजूंनी पुतळ्याची ओढाओढी झाली, यावेळी परिसरात एकच गोंधळ उडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखात पुतळा ताब्यात घेतला व कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. संजय गायकवाडांवर गुन्हा न दाखल झाल्याने मुख्यमंत्र्यांना धरले जबाबदार आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि प्रकाशक प्रशांत अंबी यांना दिलेली शिवीगाळ, या पार्श्वभूमीवर वारंवार मागणी करूनही पोलिसांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न केल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सरकार जाणीवपूर्वक अशा प्रवृत्तींना पाठबळ देत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आणि त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करत असताना कार्यकर्त्यांची पोलिसांशी मोठी हुज्जत झाली, ज्यामुळे बिंदू चौक परिसरात संतापाची लाट उसळून तणावाचे वातावरण निर्माण झाले. रोहित पवार काय म्हणाले? राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याची मागणी देखील केली. तसेच महामानवांच्या विषयी जो कोणी बोलेल त्याच्यावर जर कारवाई झाली नाही, तर अशा विचारांचे लोक असतात की ते म्हणतात की त्याच्यावर मुद्दामहून कारवाई करू नका. म्हणजे उद्या जाऊन कोणीही उठसूट महामानवांच्या विरोधात बोलेल अशी ही प्रथा पडली पाहिजे आणि भीती निघून गेली पाहिजे, असे कदाचित काही लोकांना वाटत असावे, अशी प्रतिक्रिया पवारांनी माध्यमांना दिली आहे. संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल न झाल्यास उच्च न्यायालयात जाणार- असीम सरोदे कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे. तसेच गुन्हा दाखल न केल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते म्हणाले, शिवाजी कोण होता? हे म्हणणे चुकीचे आहे. बाकीच्या गोष्टींच्याबद्दल मी माफी मागतो असे गायकवाड यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांनी आता जो कबुली जबाब दिलेला आहे, त्या आधारे त्यांना त्वरित, ते बुलढाण्यात असतील तर बुलढाण्यात किंवा मुंबईला पळून गेले असतील तर तिकडे, कारण पळून जाण्याची त्यांची परंपरा आहे. तर ते कुठे पळून गेले असतील तर तिथून पकडून आणून कोल्हापूरच्या पोलिस लॉकअपमध्ये लगेच डांबले पाहिजे. ते समाजामध्ये फिरण्यासाठी योग्य नसलेले व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंद करून घेतला नाही आणि प्रशांत आंबी आणि त्याच्या परिवरावर असेच दडपण किंवा भीतीचे सावट राहिले तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा सरोदे यांनी दिला आहे.
