संजय गायकवाडांच्या धमकीचा उलटा परिणाम!:'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या प्रतींची 4 दिवसांत मोठी विक्री, पुनर्मुद्रण सुरू
![]()
दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून महाराष्ट्रात सध्या मोठे राजकीय वादळ उठले आहे. मात्र, या वादाचा एक अनपेक्षित परिणाम समोर आला असून, अवघ्या चार दिवसांत या पुस्तकाच्या १० हजारहून अधिक प्रतींची विक्रमी विक्री झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर, सर्वसामान्यांमध्ये या पुस्तकाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती. “तुझे काय झाले ते पाहिले ना? तुला घरात घुसून मारेन,” अशी धमकी देणारी ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. या प्रकारानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला आणि हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू आमदार गायकवाड यांच्या धमकीनंतर या पुस्तकाची मागणी प्रचंड वाढली आहे. ‘लोकवाङ्मय’, ‘श्रमिक प्रतिष्ठान’ आणि ‘साऊ प्रकाशन’ यांसारख्या संस्थांकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो ऑर्डर्स येत आहेत. गेल्या चार दिवसांत १० हजार प्रती विकल्या गेल्याने सध्या बाजारातील साठा संपला आहे. परिणामी, वाचकांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकाशकांनी नव्या आवृत्तीच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. ३७ वर्षांचा इतिहास आणि २० लाख प्रती कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ मध्ये लिहिलेले हे ७२ पानांचे छोटेखानी पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रगतशील, पुरोगामी आणि लोककल्याणकारी राजा म्हणून ओळख करून देते. आतापर्यंत या पुस्तकाच्या २० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक हिंदी, इंग्रजीसह तब्बल २४ भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर करून समाजात जी तेढ निर्माण केली जाते, त्याला छेद देणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. नावावरून आधीही झाले होते वाद या पुस्तकाच्या शीर्षकावरून यापूर्वीही काही वेळा वाद निर्माण झाले होते. त्यावेळी कॉ. पानसरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले होते की, हे पुस्तक ‘शिवाजी महाराज कोण होते?’ हे सांगण्यासाठीच लिहिले आहे, त्याचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नाही. पानसरे यांच्या खुनानंतरही हे पुस्तक विचारप्रवाहाचा महत्त्वाचा भाग ठरले आहे.
