45 अंशांच्या कडाक्यात राष्ट्रपती मुर्मूंचे सेवाग्रामात वृक्षारोपण:साधेपणातून दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश

0
ezgifcom-animated-gif-maker-1_1776341927.gif




वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा तब्बल ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचलेला असतानाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देत साधेपणा, स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. त्यांच्या या दौऱ्यामुळे वर्धा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सेवाग्राम आश्रमात आगमन होताच राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर आश्रमात जतन करून ठेवलेल्या गांधीजींच्या ऐतिहासिक वस्तूंची त्यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी गांधी विचारांचा जवळून अनुभव घेतला. भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी स्वतः सूत काताई करत गांधीजींच्या स्वावलंबनाच्या तत्त्वांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. साधेपणातून मोठा संदेश देणारी ही कृती विशेष ठरली. उष्णतेचा तीव्र कडाका असतानाही राष्ट्रपती मुर्मू यांनी आश्रम परिसरात बेलाच्या वृक्षाचे वृक्षारोपण केले. ४५ अंश तापमानात केलेल्या या वृक्षारोपणातून त्यांनी निसर्गसंवर्धनाचा ठोस संदेश दिला. नागरिकांनी वृक्षलागवडीकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही या कृतीतून अधोरेखित झाले. या प्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे सेवाग्राम आश्रम पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला असून, गांधी विचार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देशभर पोहोचवणारा हा दौरा ठरला आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks