महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला यूपीमध्ये अपघात:कारला वाचवताना प्रयत्नात बस रेलिंगला धडकली, 2 महिलांचा मृत्यू, 35 जखमी
![]()
तीर्थटनासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आध्यात्मिक आनंदाने नेपाळच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या खासगी बसचा वाराणसी-गोरखपूर महामार्गावर उत्तर प्रदेशातील नादगंज जवळील नवसारा येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे आणि परिसरातील ४४ भाविक काही दिवसांपूर्वी खासगी बसने धार्मिक पर्यटनासाठी तीर्थयात्रेवर निघाले होते. या भाविकांनी अयोध्या आणि वाराणसी येथील दर्शन आटोपले होते. आज सकाळी ही बस वाराणसीहून नेपाळच्या दिशेने मार्गस्थ झाली असताना ही दुर्घटना घडली. नवसारा परिसरात समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात दोन महिलांचा मृत्यू या घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिनखेड येथील रहिवासी सरस्वती पाखरे आणि अकोला जिल्ह्यातील अन्नपूर्णाबाई या दोन ज्येष्ठ महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या ३५ प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची बातमी मोताळा तालुक्यात पोहोचताच धामणगाव बढे आणि रोहिनखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या परिवारातील सदस्य सुरक्षित आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी नातेवाईकांनी प्रशासकीय यंत्रणेकडे धाव घेतली आहे. प्रशासनाची तत्परता आणि मदतकार्य अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. उत्तर प्रदेशचे एसएसपी राकेश मिश्रा यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “अपघातातील मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून, त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले आहेत. जखमींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” गेल्या काही दिवसांपासून श्रद्धेने तीर्थाटनावर निघालेल्या या भाविकांच्या प्रवासाचा अंत इतक्या भीषण अपघातात होईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असून, जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्यासाठी समन्वय साधला जात आहे.
