नांदेड महानगरपालिकेत तृतीयपंथी प्रतिनिधित्वाबाबत डॉ. सान्वी जेठवाणी यांची खंत
नांदेड महानगरपालिकेत तृतीयपंथी प्रतिनिधित्वाबाबत डॉ. सान्वी जेठवाणी यांची खंत
नांदेड (प्रतिनिधी):
महाराष्ट्रातील तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी नांदेड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्या नावाची शिफारस न झाल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली आहे. राज्यात सामाजिक न्यायाची भूमिका मांडली जात असली, तरी तृतीयपंथी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत अद्याप गांभीर्याने विचार केला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. जेठवाणी सध्या महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्ष, सदस्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष, तसेच इंटरनॅशनल किन्नर अखाड्याच्या PRO म्हणून कार्यरत आहेत. त्या एक प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि मॉडेल असून, तृतीयपंथी समाजातून ‘मिस प्लस साईज इंडिया’ हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत.
सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, त्यांनी खा. अशोकराव चव्हाण आणि खा. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निवडणुकीच्या काळात पक्षासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले होते. मात्र, त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची दखल न घेतल्याने त्या नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जेठवाणी यापूर्वी भारत निवडणूक आयोगाच्या राज्य आयकॉन म्हणूनही कार्यरत होत्या. त्यांनी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले असून, तृतीयपंथी धोरण २०२४ तयार करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या पुढाकारातून राज्यातील पहिला तृतीयपंथी सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनू’ आयोजित करण्यात आला होता. २०१७ पासून त्यांच्या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही सातत्याने केले जात आहे.
तृतीयपंथी समाजासाठी रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी त्या सातत्याने कार्य करत आहेत. सध्या त्या चार तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही सांभाळत आहेत.
या पार्श्वभूमीवर, त्यांनी पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही तृतीयपंथी समाजाला राज्यसभा किंवा विधानपरिषदेसारख्या मंचांवर प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी केली आहे.
“आज देश-विदेशात तृतीयपंथी समाजाला संधी दिली जात आहे; मात्र महाराष्ट्रात राजकीय न्याय मिळण्याची प्रतीक्षा कधी संपेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भविष्यात पक्ष नेतृत्व तृतीयपंथी समाजातील सक्षम व्यक्तींना योग्य स्थान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
