![]()
राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून, सरकारी दावे केवळ ‘बनवाबनवी’ आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, उद्योगांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी आणि ठराविक वेळेत मिळतील, अशी कोणतीही प्रभावी योजना अद्याप जमिनीवर उतरलेली नाही. आजही उद्योगांना जमिनी मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते आणि उघडपणे ‘घूस’ द्यावी लागते, हीच वस्तुस्थिती आहे. मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष विजय वडेट्टीवार म्हणाले की, पायाभूत सुविधांवरील खर्चाच्या नावाखाली मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. पायाभूत सुविधा मजबूत झाल्याच पाहिजेत, पण त्या नादात शेती आणि रोजगार निर्मिती या विषयांकडे दुर्लक्ष होता कामा नये. इराण युद्धासारख्या जागतिक संकटांमुळे डिझेल-पेट्रोलच्या किमती वाढतील, अशा वेळी सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. ही आकडेवारीची बनवाबनवी विजय वडेट्टीवार म्हणाले की,डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य रोज 60 ते 70 पैशांनी घसरत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याचा मोठा फटका शेती उत्पादनावर आणि आयात-निर्यातीवर होईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वडेट्टीवार म्हणाले, अहवालात महाराष्ट्र प्रगत असल्याचे दाखवण्यासाठी वरच्या क्रमांकावर असलेल्या राज्यांची नावे जाणीवपूर्वक लपवण्यात आली आहेत. ही केवळ आकडेवारीची बनवाबनवी आहे. दरडोई उत्पन्न वाढीसाठी सरकारच्या काय उपाययोजना विजय वडेट्टीवार म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागातील वाढत्या दरीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, राज्यातील केवळ 4-5 जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न 3 लाखांच्या वर आहे, तर निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे उत्पन्न 2 लाखांच्या खाली आहे. ही दरी कमी करण्यासाठी सरकारकडे कोणताही आराखडा नाही. तसेच, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेतही सरकार केवळ दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, यावर ते सविस्तर माहिती घेणार असल्याचेही स्पष्ट केले.
राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला:सरकारी दावे म्हणजे केवळ बनवाबनवी, उद्योगांसाठी अजूनही मोजावी लागते घूस- विजय वडेट्टीवार
