अमित शहांच्या दबावाखाली 5 हजार कोटींना शिवसेना विकली:शहांना उपपंतप्रधान व्हायचे आहे पण मोदींनी नकार दिला- संजय राऊत




केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली येऊन शिवसेना पक्ष आणि चिन्ह 5 हजार कोटी रुपयांना एकनाथ शिंदे यांना विकल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार फोडणे, त्यांचा गुजरात ते गोवा प्रवास, आणि निवडणूक आयोग मॅनेज करणे यासाठी जनतेचा तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून यामध्ये निवडणूक आयोगाने दलालाची भूमिका पार पाडल्याचा घणाघात राऊत यांनी केला. संजय राऊत म्हणाले की, अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तशी मागणी केली आहे की मला तुमचा राजकीय वारस घोषित करा, उपपंतप्रधानपद द्या पण मोदींनी त्यासाठी नकार दिला आहे. आयोगाने आतापर्यंत 4 पक्ष विकले संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने आतापर्यंत 4 राजकीय पक्ष विकले आहेत. यामध्ये आमचा शिवसेना पक्ष, शरद पवार यांचा पक्ष, ममता बॅनर्जी यांचा पक्ष आणि आणखी एका पक्षाचा समावेश आहे. जर निवडणूक आयोगच पक्ष विकत असेल, तर या देशात लोकशाही कशी उरेल? अशा भ्रष्टाचाराला कागदोपत्री पुरावे नसतात; पक्ष विकला जाणे हाच यातील सर्वात मोठा पुरावा आहे. या अन्यायाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालय खरेदी केले आहे का? निकाल आपल्याच बाजूने लागणार असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, निकाल आमच्याच बाजूने लागणार असे ठामपणे सांगणाऱ्या लोकांनी न्यायालय खरेदी केले आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ‘मी तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका’ असे गद्दारांना सांगतात, तेव्हा ते सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून निकाल बाजूने लावण्याचे सूचवत होते का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, तरीही देशाच्या संविधानाचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिब्बलांच्या युक्तिवादाने न्यायालय विचारात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर बोलताना राऊत म्हणाले की, आमचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत संवैधानिक चौकटीत राहून प्रभावी युक्तिवाद केला आहे. उद्या सत्ताधारी पक्षातील कोणीही येईल आणि दुसऱ्या पक्षाचा विधिमंडळातील गट विकत घेऊन सत्तेत सामील करून घेईल. यामुळे देशातील लोकशाही आणि संविधानासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, या सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे न्यायालयही काही काळ विचारात पडल्याचे राऊतांनी सांगितले. शिवसेना पक्षाची घटना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तयार झाली असून ती आयोगाला कळवण्यात आली होती; असे असताना पक्षाला अलोकशाहीवादी म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *