![]()
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिवजयंतीच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शिवज्योत घेऊन धावणाऱ्या दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीडच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ही दुर्घटना घडली. विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या दोन तरुणांना भरधाव कारने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने शिवजयंतीचा उत्साह क्षणात शोकात बदलला असून आंदर मावळ परिसरात दुःखाची छाया पसरली आहे. मृत्यू झालेल्या तरुणांची ओळख ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी झाली आहे. दोघेही शिवभक्त विसापूर किल्ल्यावरून पारंपरिक पद्धतीने शिवज्योत घेऊन आपल्या शिंदेवाडी या गावी परतत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यासाठी त्यांनी किल्ल्यावरून ज्योत आणण्याची जबाबदारी घेतली होती. रात्री उशिरा हे दोघे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव परिसरात पोहोचले. तेव्हा अचानक विरुद्ध दिशेने आलेल्या एका कारने नियंत्रण गमावत दुभाजक ओलांडला आणि सरळ या दोघांवर धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, कार अतिशय वेगाने येत होती. चालकाने वाहनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुभाजक तोडून कार थेट शिवज्योत घेऊन धावत असलेल्या ओंकार आणि दर्शनवर आदळली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. शिवजयंतीसारख्या आनंदाच्या दिवशी घडलेल्या या अपघातामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. गावातील लोकांनी या दोन्ही तरुणांबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. दरवर्षी शिवज्योत आणण्याच्या परंपरेत सहभागी होणारे हे दोघे तरुण अत्यंत उत्साही आणि सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी निघालेल्या तरुणांचे असे दुर्दैवी निधन झाल्याने अनेकांनी सोशल मीडियावरही शोक व्यक्त केला आहे. राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात दरम्यान, राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पुणे शहरातही विविध भागांत मिरवणुका आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. लक्ष्मी रोड, नेहरू रोड, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रोड या प्रमुख मार्गांवर मिरवणुका निघणार असल्याने या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही मार्गांवर वाहतूक पूर्णपणे बंद वाहतूक बदलांनुसार जिजामाता चौकातून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक आणि टिळक रोडमार्गे वळवले जाणार आहे. दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक आणि जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूकही पर्यायी मार्गाने सोडण्यात येणार आहे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहने केळकर रोडमार्गे वळवण्यात येतील. तसेच मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रोडवरील वाहने संत कबीर चौकाकडून वळवण्यात येणार आहेत. मिरवणुका सुरू झाल्यानंतर काही मार्गांवर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याने नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या दोन तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू:शिवजयंतीच्या दिवशी काळाचा घाला; भरधाव कारचा धक्का
