आपला देश न्यायव्यवस्थेवर चालतो:अरविंद केजरीवाल प्रकरणी अण्णा हजारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- यापूर्वी कोर्टाचा निकाल नव्हता म्हणून आरोप केले




दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सीबीआयच्या तपासाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व 23 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आरोपपत्रात लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अण्णा हजारे म्हणाले, आपला देश न्यायव्यवस्थेवर चालतो. आपल्या देशात न्यायव्यवस्था सर्वोच्च स्थानावर आहे. आपला देश खूप मोठा आहे, पक्ष-पार्टी, जाती-पाती, धर्म, इतका मोठा आपला देश आहे, पण सगळे सुरळीत चालते, याचे कारण न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्थेच्या आधारवर आपल्याला चालावेच लागणार आहे. जर न्यायव्यवस्था नसती तर हे गुंड, लफंगे, दंगली झाल्या असत्या. परंतु, न्यायव्यवस्था आहे म्हणून सगळे योग्य सुरू असल्याचे हजारे यांनी म्हटले. पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले, मी यापूर्वी अरविंद केजरीवालच्या बाबतीत जे काही म्हटले असेल तेव्हा न्यायव्यवस्थेचा निर्णय नव्हता. आता न्यायव्यवस्थेने निर्णय दिला आहे की त्यांचा काही दोष नाहीये, तर आपल्याला मान्य करावे लागेल. तेव्हा न्यायव्यवस्थेचा निर्णय नव्हता म्हणून मोघम, हवेत बोलले जात होते. जर तेव्हा न्यायव्यवस्थेचा निर्णय असला असता तर मी असे काही म्हटलेच नसते. अण्णा हजारे म्हणाले, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोडिया हे माझे जुने कार्यकर्ते आहेत. मी त्यांना एकच सल्ला देईल की, समाज आणि देशाच्या हितासाठी जे काही करता येईल ते करत रहा. स्वतःच्या आणि पक्षाबद्दल विचार नका करू. देशाचा विचार करा. देशाला पुढे न्यायचे आहे. अनेकांच्या बलिदानाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, हे विसरून चालणार नाही. केजरीवाल म्हणाले- मोदी-शहा यांनी आमच्या विरोधात कट रचला:न्यायालयाच्या निर्णयानंतर मनावरचे मोठे ओझे उतरले; जनतेला माहिती आहे की आम्ही प्रामाणिक दिल्ली दारू धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. माजी मुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्याविरुद्ध कट रचला. जेव्हा ते ‘आप’ला हरवू शकले नाहीत, तेव्हा ते ‘आप’ला नष्ट करण्यासाठी निघाले.” वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *