![]()
उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मदतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण आज राज्यसभेच्या निवडणुकीत पवार अडचणीत असताना उद्धव यांनी सहकार्याऐवजी त्यांच्या विरोधाची भूमिका घेतली, अशी टीका भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधताना केली आहे. राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 तारखेला निवडणूक होणार आहे. विद्यमान संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला 7 पैकी 1 जागा येण्याची शक्यता आहे. पण या जागेवर ठाकरे गटाने दावा ठोकला आहे. शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला, तर ठाकरे गट या जागेवरील दावा सोडेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ठाकरे गटाने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वरील शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरेंसाठी परतफेडीची संधी होती, पण… केशव उपाध्ये म्हणाले, ज्या शरद पवारांच्या आग्रहावरून मविआचे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेच शरद पवार आज राज्यसभेच्या निवडणुकीत अडचणीत असताना उध्दव ठाकरे यांनी सहकार्याऐवजी विरोधाची भूमिका घेतली आहे. खरं तर ही उध्दव ठाकरे यांच्यासाठी परतफेडीची संधी होती. पण राजकारणात कृतज्ञतेपेक्षा स्वार्थ हाच मोठा ठरतो, याचंच हे उदाहरण म्हणावं लागेल. मुख्यमंत्रीपदाच्या काळातील उद्धव ठाकरे यांच्या वर्तनाबाबतची नाराजी पवारांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केली होतीच; मात्र आता खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार हे उध्दव ठाकरे यांच्या राजकीय शैलीचा आणखी एक अनुभव घेत असतील. राजकारणात मैत्री आणि वैर दोन्ही कायमस्वरूपी नसतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. सत्ता, समीकरणं आणि स्वार्थ यांच्या भोवऱ्यात जुने उपकार आणि संबंध किती लवकर विस्मृतीत जातात, याचं हे ताजं उदाहरण म्हणता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे, सरदेसाईंचा जागा सोडण्यास नकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे व वरुण सरदेसाई यांनी शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडण्यास ठाम नकार दर्शवला आहे. सरदेसाई या प्रकरणी बोलताना म्हणाले होते, आम्ही राज्यसभेच्या जागेवरील आमचा दावा सोडणार नाही. आम्ही आमची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडली आहे. आम्ही 2020 मध्ये राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांना मदत केली होती. त्यावेळी आम्ही आमच्या संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. पण संख्याबळ असतानाही त्यांचा पराभव झाला होता. आता आमचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेवर जाईल. आत्ता पाहू महाराष्ट्रातील कोणते नेते होणार निवृत्त? राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 खासदारांचा येत्या 2 एप्रिल रोजी कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यात शरद पवारांसह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, खासदार धैर्यशील मोहन पाटील, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेस खासदार रजनी पाटील व शरद पवार गटाच्या खासदार डॉक्टर फौजिया खान यांचा समावेश आहे.
राजकारणात कृतज्ञतेपेक्षा स्वार्थ हाच मोठा:उद्धव ठाकरेंनी शरद पवारांविरोधात भूमिका घेतली, भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीवरून केला दावा
