चंद्रग्रहण खगोलीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही:अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, अंनिसची सरकारकडे मागणी




देशभरात आज धुलिवंदनचा उत्साह असतानाच, वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचे सावट पाहायला मिळत आहे. या ग्रहणामुळे अनेक मंदिरांचे दरवाजे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून, पारंपारिक प्रथांच्या नावाखाली अनेक ठिकाणी शुभ कार्यांना मनाई केली जात आहे. मात्र, “ग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना असून त्याबद्दल अफवा व अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केली आहे. आज, बुधवार ३ मार्च रोजी होणाऱ्या या चंद्रग्रहणाबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. यावर भाष्य करताना ‘अंनिस’चे डॉ. हमीद दाभोळकर म्हणाले की, “ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. मात्र, सोशल मीडियातून जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.” गर्भवती महिलांबाबतचे सल्ले अवैज्ञानिक विशेषतः गर्भवती महिलांना लक्ष्य करून दिले जाणारे सल्ले अत्यंत चुकीचे असल्याचे दाभोळकर यांनी नमूद केले. ग्रहण काळात महिलांनी एकाच जागेवर बसून राहावे, पाणी पिऊ नये किंवा मलमूत्र विसर्जन करू नये, अशा प्रकारचे सल्ले समाजमाध्यमांतून दिले जात आहेत. हे सर्व सल्ले मानवी आरोग्यासाठी घातक असून त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असे दाभोळकर म्हणालेत. कायदेशीर कारवाईची मागणी सोशल मीडिया आणि विविध संस्थांच्या माध्यमातून ग्रहणाबद्दल भीतीदायक आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. अशा व्यक्ती आणि संस्थांवर कायदेशीर बडगा उगारण्याची विनंती अंनिसने सरकारकडे केली आहे. “विज्ञानाच्या युगात अशा भ्रामक कल्पनांना थारा देणे चुकीचे असून, नागरिकांनी खगोलीय घटनेचा आनंद वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यावा,” असे आवाहनही हमीद दाभोळकर यांनी केले. पुण्यातील प्रसिद्ध मंदिरे बंद पंचांगानुसार, आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात झाली असून ते संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत चालणार आहे. या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दुपारी दर्शनासाठी बंद करण्यात आले. साडेसहाच्या सुमारास ग्रहण मोक्ष झाल्यानंतर मंदिराची विधीवत शुद्धी आणि पूजा केली जाईल, त्यानंतरच भाविकांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. अशीच स्थिती राज्यातील अन्य प्रमुख देवस्थानांमध्येही पाहायला मिळत आहे. घृष्णेश्वर मंदिरात चार तासांसाठी दर्शन बंद जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी (३ मार्च) खग्रास चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी दुपारी तीनपासून सायंकाळी सातपर्यंत दर्शनासाठी बंद राहील. ग्रहणाच्या कालखंडात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *