![]()
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून, महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार असल्याने जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार निवृत्त होत असल्याने ही जागा आपल्याकडेच राहावी, असा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आग्रह आहे. तर सर्वाधिक आमदार असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही या जागेवर दावा ठोकला आहे. मात्र, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसनेही या एकमेव जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडे या जागेची मागणी केली आहे. या पेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून एक नवा प्रस्ताव मांडला आहे. राज्यसभेची ही जागा काँग्रेसला सोडल्यास, त्याबदल्यात विधान परिषदेची आगामी रिक्त होणारी जागा खुद्द उद्धव ठाकरेंना देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे. राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडीचे संख्याबळ टिकवण्यासाठी आणि राज्यात महाविकास आघाडीची एकजूट कायम राखण्यासाठी हा समझोता महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त केला जात आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या किमान 10 टक्के म्हणजेच 25 सदस्यांचे संख्याबळ असणे अनिवार्य असून, सध्या 27 सदस्य असलेल्या काँग्रेसला आगामी 72 जागांच्या निवडणुकीनंतर हे संख्याबळ 25 च्या खाली जाण्याची धास्ती वाटत आहे. विशेषतः जूनमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांचे महत्त्वाचे पद वाचवण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक जागा जिंकणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून रजनी पाटील यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणारी जागा पुन्हा मिळवणे ही काँग्रेससाठी केवळ प्रतिष्ठेची लढत नसून तांत्रिकदृष्ट्याही एक अनिवार्य गरज बनली आहे. पहिल्या टप्प्यातील 37 जागांपैकी कॉंग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, रजनी पाटील, फुलोदेवी नेताम आणि केटीएस तुलसी या काँग्रेस नेत्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून, जूनमध्ये खुद्द पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही मुदत संपणार आहे. या निवडणुकांमध्ये पुरेसे संख्याबळ राखण्यात काँग्रेसला अपयश आल्यास त्यांना राज्यसभेतील अत्यंत महत्त्वाचे विरोधी पक्षनेते पद गमवावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी सुरक्षित जागा मिळवण्यासाठी काँग्रेसने आग्रही पवित्रा घेतला असून, आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार या प्रस्तावावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआतील तिन्ही पक्षांची दावेदारी:दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; शरद पवारांच्या निवृत्तीमुळे राष्ट्रवादीही आग्रही
