चूक प्रशासनाची अन् वसुली शेतकऱ्यांकडून?:अतिवृष्टी अनुदान वसुलीचा तुगलकी आदेश मागे घ्या, अंबादास दानवेंचा सरकारला इशारा




शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची अतिरिक्त रक्कम वसुलीसंदर्भात तहसील कार्यालयाने काढलेल्या आदेशावर तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची पठाणी पद्धतीने वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे. अंबादास दानवे म्हणाले, गंगापूर तालुक्यातील कानकोरी येथील शेतकरी एकनाथ विनायक पवार यांच्यासह काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे 4080 रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळाले आहे. गंगापूर तहसील कार्यालयाने संबंधित रक्कम वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटीस देऊन रक्कम न भरल्यास मालमत्तेवर बोजा टाकण्यात येईल अथवा कडक कारवाई केली जाईल, असा दम दिला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रशासनाच्या चुकीमुळे रक्कम जमा झाली असेल, तर त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. चूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन शेतकऱ्यांनाच धमकी देत आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांना पिळण्यात देशात कोणीही मागे टाकू शकणार नाही, अशी टीका करत हा तुगलकी आदेश तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन करू, असा गंभीर इशारा अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *