अक्षय तृतीयेला होणारे बालविवाह रोखा:पुणे जिल्ह्यात दक्षता घेण्याचे महिला बालविकास अधिकारी यांचे नागरिकांना आवाहन
![]()
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी देशभरात अक्षय तृतीया साजरी होणार असून, या दिवशी अनेक ठिकाणी बालविवाह होण्याची शक्यता असते. जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी, पुणे यांनी संबंधित घटकांना या संदर्भात सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही बालविवाह होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत विवाह हा एक महत्त्वाचा विधी असला तरी, शासनाने मुलांसाठी २१ वर्षे आणि मुलींसाठी १८ वर्षे अशी विवाहाची कायदेशीर वयोमर्यादा निश्चित केली आहे. यापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा विवाह झाल्यास तो बालविवाह मानला जातो आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार तो बेकायदेशीर ठरतो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करतात, तर शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) हे जबाबदार असतात. गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समितीची भूमिकाही महत्त्वाची आहे. बालविवाह आढळून आल्यास, मुला-मुलींचे नातेवाईक, आई-वडील, मंडपवाले, भटजी आणि वऱ्हाडी मंडळींवर अधिनियम २००६ च्या कलम ९, १०, ११ नुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. असा कोणताही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास, नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. हे आवाहन पुणे जिल्हा महिला विकास अधिकारी रोहिणी ढवळे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांनी केले आहे.
