'आयसीएमएआय'तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:डॉ. पराग काळकर: कॉस्ट अकाउंटंट्सनी कुशल, तज्ज्ञ होण्यास प्राधान्य द्यावे




सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी कॉस्ट अकाउंटंट्सना नीतिमूल्यांची जपणूक करत विषयाचे सखोल ज्ञान घेऊन या क्षेत्रातील तज्ज्ञ होण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएमएआय) पुणे चॅप्टरतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कर्वेनगर येथील सीएमए भवनात हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी जीएसटी सहआयुक्त सीएमए संजाली डायस, ‘आयसीएमएआय’चे उपाध्यक्ष सीएमए नीरज जोशी, विभागीय समिती सदस्य सीएमए चैतन्य मोहरीर, सीएमए डॉ. संजय भार्गवे, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए श्रीकांत ईप्पलपल्ली, उपाध्यक्ष सीएमए राहुल चिंचोळकर, स्टुडेंट कोऑर्डीनेशन कमिटीचे चेअरमन सीएमए अमेय टिकले, खजिनदार सीएमए तनुजा मंत्रवादी, सीएमए हिमांशू दवे आणि अनुजा दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. दुपारच्या सत्रात गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा, सीएमए हनुमंत जमदाडे आणि सीएस कल्याणी शिरोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सीएमए सौमित्र बावठाणकर यांच्या स्मरणार्थ उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले, तर पीसीसीए आर्ट सर्कल आणि संदीप जोशी परिवाराच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पराग काळकर यांनी विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून न थांबता कृत्रिम बुद्धिमत्ता, नाविन्यता, नवनवीन कौशल्ये आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान आणि एआयमुळे मूलभूत कामे यंत्रांद्वारे होत असली, तरी निर्णयक्षमता ही माणसाचीच ताकद आहे. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यात सतत ‘रिस्किलिंग’ आणि ‘अपस्किलिंग’ करत राहणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. देशातील पायाभूत सुविधा, वित्त, प्रकल्प व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. सीएमए संजाली डायस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नोकऱ्या कमी करणारी नव्हे, तर नव्या संधी निर्माण करणारी परिवर्तनशील शक्ती असल्याचे स्पष्ट केले. जागतिक स्तरावर एआयमुळे रोजगारांबाबत मिश्र चित्र दिसत असले, तरी स्वतःला सतत अद्ययावत ठेवणारे, नवे कौशल्य आत्मसात करणारे आणि बदल स्वीकारणारे व्यावसायिक भविष्यात अधिक यशस्वी ठरतील. मानवी संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि विश्लेषणक्षम विचारशक्ती हीच खरी व्यावसायिकांची ताकद असते, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *