जिवंत पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र काढून सोलापूरच्या पतीने केले दुसरे लग्न:लातुरात बनावट कागदपत्रांद्वारे विवाह नोंदणी केल्याचे उघड, गुन्हा दाखल




पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूर येथील रहिवासी असलेल्या वैभव गोपीनाथ जाधव याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर पालिकेच्या जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाचे निबंधक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश शंकरराव पाटील यांच्या तक्रारीनुसार, आरोपीने २३ मे २०२३ ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत खोटी कागदपत्रे लातूर महापालिकेत सादर करत अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे दाखवले. त्याआधारे त्याने जिवंत पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाणपत्राच्या आधारे त्याने दुसरे लग्न करून त्या विवाहाची नोंदणीही लातूर महापालिकेतील अधिकृत नोंदवहीत करून घेतली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागाने अंतर्गत पडताळणी केली असता कागदपत्रांत विसंगती आढळली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *