खासदार वानखडे ‘दिशा’ बैठकीत उद्विग्न, वन विभागावर प्रश्नचिन्ह:मेळघाटातील विकासकामांच्या अडथळ्यांवर 15 दिवसांत बैठक घेण्याचे निर्देश




मेळघाटमधील विकासकामांना वन विभागामुळे येत असलेल्या अडथळ्यांवर खासदार बळवंतराव वानखडे यांनी ‘दिशा’ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज, रस्ते, आरोग्य, पाणी आणि मोबाईल रेंजसारख्या मूलभूत सुविधा वन विभागाच्या मंजुरीअभावी रखडल्याने त्यांनी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर, येत्या १५ दिवसांत सर्व संबंधित यंत्रणांच्या कार्यकारी अभियंत्यांची बैठक घेऊन हे अडथळे दूर केले जातील, असे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उप वनसंरक्षक (सिपना) नीता कट्टे यांनी सांगितले. खासदार वानखडे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख प्राधिकरणाची (दिशा) बैठक मंगळवारी, १७ फेब्रुवारी रोजी पार पडली. धारणी, चिखलदरा आणि अचलपूर तालुक्याचा काही भाग असलेल्या मेळघाट हा आदिवासीबहुल परिसर असल्याने, या बैठकीत मेळघाटातील समस्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. महावितरण, बीएसएनएल, जिल्हा परिषद, कृषी, मेडा, डीएचओ आणि ग्रामीण पाणी पुरवठा यांसारख्या विविध यंत्रणांनी वन विभागाच्या मंजुरीअभावी अनेक विकासकामे आणि योजना रखडल्याचे सांगितले. काही प्रकरणांमध्ये तीन-चार वर्षांपासूनचा पत्रव्यवहार प्रलंबित असून, अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्याचे यंत्रणाप्रमुखांनी निदर्शनास आणले. यामुळे खासदार वानखडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत शिक्षण, आरोग्य, पीक विमा, घरकुल, कौशल्य विकास, उद्योगधंदे आणि कर्जपुरवठा यांसारख्या विविध योजनांवरही चर्चा झाली. सभाध्यक्षांनी या योजनांमधील त्रुटींवर लक्ष वेधत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. आमदार गजानन लवटे, प्रवीण तायडे आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांनीही काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सचिव म्हणून, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि इतर अशासकीय सदस्य उपस्थित होते. बैठकीचे संचालन डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख आणि सीईओंचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे यांनी केले. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व चौदाही नगराध्यक्ष उपस्थित होते, त्यापैकी १२ नवनिर्वाचित नगराध्यक्षांची ही पहिलीच बैठक होती. धामणगावच्या अर्चनाताई रोठे, मोर्शीच्या प्रतीक्षा गुल्हाने, चांदूर रेल्वेच्या प्रियंका विश्वकर्मा, अंजनगाव सुर्जीचे अविनाश गायगोले, नांदगाव खंडेश्वरच्या प्राप्ती मारोटकर आणि तिवसाचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनीही विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *