![]()
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांच्या मोबदल्यात बोगस पदव्या दिल्या जात असल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रासाठी हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षणाच्या मंदिरात बोगसगिरीचे दुकान विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बोगस पदव्या वाटल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (X) पोस्ट करत प्रशासनावर टीका केली आहे. “पुणे विद्यापीठात बोगस पदवी देण्याचे दुकानच काही कर्मचाऱ्यांनी थाटल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. शिक्षणाच्या या पवित्र मंदिरात ३-३ लाखांत बोगस डिग्री मिळत असेल, तर हे अत्यंत चिंताजनक आहे,” असे पवार म्हणाले. “सावित्रीबाईंच्या नावाचा अवमान” एकीकडे राज्यात विविध स्पर्धा परीक्षांना आणि शैक्षणिक परीक्षांना ‘पेपरफुटी’चा रोग लागला असताना, आता थेट विद्यापीठातूनच पदव्या विकल्या जात असल्याबद्दल रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “या प्रकारामुळे विद्यापीठाच्या लौकिकाला काळिमा लागतोच, शिवाय ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचाही हा मोठा अवमान आहे.” विद्यापीठाच्या कारभारावर निशाणा या प्रकरणाच्या निमित्ताने रोहित पवार यांनी विद्यापीठाच्या कारभारावर आणि त्यावरील राजकीय प्रभावावरही थेट निशाणा साधला. “नामांकित असलेल्या या विद्यापीठाचा नेमक्या कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी ताबा घेतला आहे? आणि यामुळे विद्यापीठाची कशी बदनामी होत आहे, याचाही आता अभ्यास झाला पाहिजे,” असा टोला लगावत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यपालांनी लक्ष घालण्याची विनंती या प्रकरणातील गांभीर्य ओळखून केवळ जुजबी कारवाई न करता मुळाशी जाण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. “या प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी होऊन शिक्षणाच्या पवित्र मंदिरात बोगसगिरीचे दुकान उघडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती महोदयांनी यामध्ये स्वतः गांभीर्याने लक्ष घालावे,” अशी अधिकृत विनंती रोहित पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे केली आहे. हेही वाचा.. राज्यात वरुणराजाचे दमदार कमबॅक: विदर्भात ऑरेंज तर उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट; नागपूर-गडचिरोलीत शाळांना सुट्टी राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भाला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, मुंबई, कोकण आणि मराठवाड्यासह उर्वरित राज्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसाचा वाढता जोर आणि संभाव्य धोका पाहता गडचिरोली तसेच नागपूरमधील शाळा-महाविद्यालयांना आज प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
पुणे विद्यापीठात 3 लाखांत डिग्री?:हा सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा अवमान, रोहित पवारांचा घणाघात; राज्यपालांकडे चौकशीची मागणी
